औंध (वार्ताहर):- नांदोशी ता.खटाव येथे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.
यावेळी सरपंच व ग्रामदक्षता समिती अध्यक्ष नवल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.यावेळी गावामध्ये परजिल्हयातून तसेच मुंबई,पुणे येथून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची नोंद ठेवणे ,आरोग्य तपासणी करणे तसेच अशा व्यक्तिंना होम क्वारंटाईन करणे गरजेचे आहे असे सांगून गावातील प्रत्येक सदस्याने याबाबत जागृत रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामसेवक सोमनाथ सावंत यांनी शासनामार्फत घेण्यात येत असलेली खबरदारी व विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी त्यांनी प्राथमिक शाळेतील चार वर्ग खोल्या रुग्णांच्या क्वारंटाईन साठी सज्ज करण्यात आल्याची माहिती दिली.
गावातील सर्व विभागात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली तसेच गावात प्रत्येक कुटुंबाचे कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून समुपदेशन करण्यात आले.
गावातील नागरिकांच्या समस्या ही जाणून घेण्यात आल्या .
यावेळी ग्रामसेवक सोमनाथ सावंत यांनी पुढाकार घेत गावात स्वच्छता मोहीम राबविली पाच टीम तयार करून जनजागृती अभियान राबविले यामध्ये युवक ,ग्रामस्थ, महिलांना ही सहभागी केले.
नांदोशी गावातील अनेक ग्रामस्थांची रेशनकार्ड औंध येथील खरेदी विक्री संघाच्या दुकानास जोडलेली आहेत .या कठीण परिस्थितीत नांदोशी ग्रामस्थांना गावातच रेशनिंग मिळावे अशी मागणी ही ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडे केली.
याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सरपंच नवल थोरात यांनी दिले.
यावेळी उपाध्यक्ष एस.पी.मराडे, पोलीस पाटील विनोद थोरात,मेजर हणमंत चव्हाण, संगीता चव्हाण, गायकवाड ,डुबल,दादा मेळावणे, शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सोमनाथ सावंत यांनी मानले