Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसह्याद्रीच्या डोगरदऱ्यांत ‘प्रकाशदुतां’ची शर्थीची झुंज ; अतिदुर्गम बामणोली खोऱ्यातील 15 गावे...

सह्याद्रीच्या डोगरदऱ्यांत ‘प्रकाशदुतां’ची शर्थीची झुंज ; अतिदुर्गम बामणोली खोऱ्यातील 15 गावे प्रकाशले

सातारा, दि20 एप्रिल 2020 : वादळी पावसाच्या जोरदार तडाख्याने तब्बल 20 वीजखांब व दोन रोहित्र जमीनदोस्त झाल्यामुळे जावली तालुक्यातील (जि. सातारा) अतिदुर्गम बामणोली खोऱ्यातील 15 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी डोंगरदऱ्यात, जंगलात उद्ध्वस्त झालेल्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोरोना विषाणूच्या सावटात तब्बल पाच दिवस शर्थीची झुंज दिली आणि रविवारपर्यंत (दि. 19) टप्प्याटप्प्याने सर्वच 15 गावे प्रकाशमान केली आहे.

याबाबत माहिती अशी की, सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील बामणोली खोऱ्यात मंगळवारी (दि. 14) सायंकाळी वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. त्यामुळे डोंगरदऱ्यात व गर्द जंगलात असलेल्या महावितरणच्या वीजयंत्रणेला मोठा फटका बसला. उच्च व लघुदाबाच्या 20 वीजखांबांसह 2 रोहित्राची वीजयंत्रणाही जमीनदोस्त झाली. फयाण वादळानंतर प्रथमच अशा प्रकारचा तडाखा वीजयंत्रणेला बसला. महावितरणच्या वाई विभाग अंतर्गत तापोळा शाखेअंतर्गत व दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या बामणोली, म्हावशी, पावशेवडी, मुनावले, फाळणी, अंधारी, कोरघळ, आंबवडे, कारगाव, पिसाडी, काळकोशी, उमरेवाडी, शिवचिवाडी, शेबडी व वाघळी या गावांमधील सुमारे 750 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 20 नवीन वीजखांब व दोन रोहित्रांची नवीन यंत्रणा उभारणे, 250 ते 380 मीटरचे अंतर असलेल्या दोन खोल दऱ्यांमधून वीजतारा ओढणे, उन्मळून पडलेले झाडे व फांद्यांमध्ये गुरफटलेल्या वीजतारा काढण्यासह इतर तांत्रिक कामे करणे आवश्यक होते. या 15 गावांपैकी 6 गावे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात तर उर्वरित गावे डोंगरमाथ्यावर असल्याने महावितरणच्या तापोळा शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. दत्तात्रेय जरे व सहकाऱ्यांना नैसर्गिक प्रतिकुलतेचे खडतर आव्हान होते. बुधवारी (दि. 15) दुरुस्तीच्या कामासाठी सर्वप्रथम सातारा येथून नवीन वीजखांब व इतर आवश्यक साहित्य बामणोली गावात पाठविण्यात आले. त्यासोबतच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाची परवानगी घेऊन महावितरणचे कंत्राटदार मॅगट्रॉन इलेक्ट्रीकल्सचे 12 कर्मचारी सातारा येथून बामणोली येथे आले. त्यानंतर तापोळ्याचे सहाय्यक अभियंता श्री. दत्तात्रेय जरे, मेढाचे सहाय्यक अभियंता राहुल कवठे तसेच 14 जनमित्र अशा एकूण 28 जणांनी दुरुस्ती कामाला सुरवात केली.

सह्याद्री पर्वतरागांमधील घनदाट व गर्द झाडांचे जंगल, बिबट्या, अस्वल, रानगवे आदी वनचरांचा संचार, डोंगरदऱ्यातील बिकट रानवाट, वाहतुकीसाठी कोणतेही साधन नाही तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर आदी नैसर्गिक परिस्थितीत डोंगरमाथ्यावर नवीन वीजखांब कर्मचाऱ्यांना खांद्यावर घेऊन जावे लागले. महावितरण व कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील गावांमध्येच मुक्काम करीत युद्धपातळीवर दुरुस्तीकामाला सुरवात केली. सकाळी 8 ते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत अविश्रांत काम करण्यात आले. रात्री मोबाईल व बॅटरीच्या प्रकाशझोतात हे काम झाले. अत्यंत जिकरीच्या व त्यातच दोनदा पावसाच्या हजेरीमध्येही या दुरुस्ती कामाच्या पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी प्रत्येकी दोन तसेच चौथ्या व पाचव्या दिवशी प्रत्येकी पाच अशा एकूण 15 गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत केला. याकामी वाई विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संजय सोनवलकर यांनी सहकार्य केले. दऱ्याखोऱ्यातील जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा पुन्हा उभारण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे व सातारा मंडलचे प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. उदय कुलकर्णी हे दुरुस्ती कामाकडे लक्ष ठेऊन होते. अत्यंत बिकट नैसर्गिक परिस्थितीतही वीजपुरवठा पूर्ववत केल्याबद्दल त्यांनी अभियंता व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

या आव्हानात्मक दुरुस्तीकामात महावितरणचे जनमित्र रामू नाईक, गणेश जंगम, किरण मोरे, किरण माने, गणेश मोरे, समीर उतेकर, सचिन जाधव, मारुती जाधव, धनाजी चव्हाण, संजय पाटणे, नीलेश संकपाळ, तानाजी कदम, आनंदा शेलार, प्रमोद चव्हाण आदींनी योगदान दिले. दुरुस्ती कामाच्या ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत गाव प्रकाशल्याचा आनंदही व्यक्त केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular