Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअजिंक्यतारा कारखान्याकडून १५० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा :- आ. शिवेंद्रसिंहराजे ; ...

अजिंक्यतारा कारखान्याकडून १५० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा :- आ. शिवेंद्रसिंहराजे ;  व्यवस्थापनाच्या आर्थिक नियोजनामुळे शेतकऱ्यांना दिलासा  

सातारा-  कोरोना महामारीसोबतच मोठं आर्थिक संकट सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कोसळलं आहे. अशा गंभीर परिस्थितीत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे खंबीरपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचे  स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी काटकसरीने आर्थिक नियोजन करून तसेच कामगारांच्या पगारात कोणतीही कपात न करता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना १५० रुपयाने दुसरा हप्ता आदा केला आहे. कारखान्याच्या या मोलाच्या आर्थिक नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम अंतीम टप्प्यात असून या हंगामाकरिता केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या सूत्रानुसार एफ.आर.पी. प्रति मे.टन रूपये २७९०/- निघालेली आहे. गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल प्रति मे.टन रूपये २५००/ प्रमाणे पेमेंट दर १0 दिवसांप्रमाणे दि.१५.४.२०२० पर्यंत संबंधीत ऊस पुरवठादारांचे बैंक खाती वर्ग करण्यात आले आहे. जेणेकरून सोसायटी, बँक कर्जाचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार नाही व त्यांच्या व्याजात बचत व्हावी या उदेशाने दर १० दिवसांनी पेमेंट आदा करण्यात आलेले आहे. दरम्यान, कोरोना महामारी आणि आर्थिक संकटाच्या काळात शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे आणि संचालक मंडळाने तातडीने निर्णय घेऊन १५० रुपये प्रति टन याप्रमाणे उसाचा दुसरा हप्ता उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना या गंभीर परिस्थितीत मोठा आधार मिळाला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर कारखाना संचालक मंडळाने लक्ष केंद्रीत करून तातडीने दुसऱ्या हप्त्याचे पेमेंट आदा करता यावे यासाठी तसे आर्थिक नियोजन करून या हंगामात दि.३१ मार्च २०२० पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला प्रति में टन रूपये १५०/- प्रमाणे पेमेंट संबंधीत  शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत  झालेल्या एकूण ४,९५,५३०.९७९ मे.टन ऊसाचे गाळपास प्रति मे.टन रूपये १५०/- प्रमाणे एकूण ७ कोटी ४३ लक्ष ३० हजार १२ रूपये एवढी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बंक खाती वर्ग करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित कालावधीचे प्रति मे.टन रूपये १५०/- प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येणार असून एफ.आर.पी. तील उर्वरित रक्कमही लवकरात लवकर आदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
 मागील वर्षी २०१८-२०१९ हंगामामध्ये ऊसाचे पेमेंट वेळेत आदा केल्यामुळे साखर आयुक्त यांनी पत्राद्वारे संचालक मंडळाचे अभिनंदन करून कौतुक केले होते. याही हंगामाचे एफ.आर.पी. प्रमाणे उर्वरित देय पेमेंट लवकरच आदा करण्यासाठी तसे आर्थिक नियोजन व्यवस्थापनाने केले असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी माहिती दिली की, कारखान्याने आत्तापर्यंत ५.७७,३५० मे.टनाचे गाळप करून सरासरी १२.४९% साखर उताऱ्याने ७,१७,७९० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अंतीम टप्प्यात असून अद्यापही कारखान्याकडे गाळपासाठी ४०,००० मे.टन ऊस शिल्लक असून या शिल्लक ऊसाचे माहे एप्रिलअखेर गाळप पूर्ण होईल. म्हणजेच या हंगामात अंदाजे एकूण ६,१०.००० मे.टनाचे गाळप पूर्ण होईल.
अजिंक्यतारा कारखान्याने या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला दर १० दिवसांप्रमाणे पेमेंट आदा केल्यामुळे सोसायटी, बँक कर्जाचे व्याजामध्ये काही अंशी बचत झाल्याने दुसऱ्या हप्त्याचे पेमेंट अडचणीचे वेळी आदा केल्यामुळे भागातील ऊस पुरवठादारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular