औंध वार्ताहर. :- हरणाई सुतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाने रेशनिंग पासून वंचित असलेल्या केशरी कार्ड धारकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त दरातील नियमित अन्न धान्य देण्याचे आदेश दिले आहेत. वंचित कार्डधारकांना धान्य मिळावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी केली होती.
२०१४ साली राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाकडून प्रत्येक गावातील एकूण केशरी कार्ड धारकांच्या ७४ टक्के कार्डधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत करून त्यांना स्वस्त दरातील अन्न धान्य वापट करण्यात येत आहे. मात्र उर्वरित २६ टक्के केशरी कार्डधारक या योजनेपासून वंचित राहिल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे स्वस्त दरातील धान्य मिळत नव्हते.त्यामुळे २६ टक्के वंचित केशरी कार्डधारकांची ससेहोलपट सुरू होती. माण खटाव मधील दुष्काळी तालुक्यातील गरीब गरजू कुटुंबाना सध्याच्या भीषण स्थितीत दिलासा देण्यासाठी रेशनिंग कार्डधारकांना सरसकट लाभार्थी कुटुंब योजनेत समावेश करून त्यांना सवलतीच्या दरातील स्वस्त धान्य मिळण्यासाठी संबधीतांना आदेश करावेत अशी मागणी देशमुख यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडे केली होती. त्यामुळे शासनाने या वंचित केशरी कार्डधारकांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील धान्य सवलतीच्या दरात देण्याचे आदेश दिले आहेत. खटावच्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना याबाबत आदेश निगर्मित केले आहेत. अडचणीच्या प्रसंगात स्वस्त दरातील धान्य मिळणार असलेल्या वंचित कार्डधारकांनी समाधान व्यक्त केले आहे