औंध(वार्ताहर):- खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने औंधसह परिसरातील गावे हादरून गेली असून सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे अनेक गावांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण पसरले होते .दरम्यान रात्री उशीरा खरशिंगे गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी ,ठाणे येथे असणारे खरशिंगे येथील एक कुटुंब सहा मे रोजी दुचाकी वरून जिल्हा बंदीचे उल्लंघन करून खरशिंगे येथे आले होते
त्यानंतर त्यांच्यावर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या कुटुंबाला गावालगत होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
मात्र दहा मे रोजी संबंधित कुटुंबातील एका व्यक्तीला त्रास जाणवू लागल्याने सर्वांचे स्वँबचे नमुने घेण्यात आले सोमवारी रात्री उशिरा याबाबत तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधित त्रास झालेल्या व्यक्तीचा पहिला रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे तर त्यांंच्या 21
वर्षीय मुलाचा अहवाल पाँझिटीव्ह आल्याने खटाव तालुका प्रशासनासह औंध परिसर हादरून गेला. रात्री उशिरा खरशिंगे गावास प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे,तहसीलदार डॉ. अर्चना पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी.बी.महामुनी, गटविकास अधिकारी काळे
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख,
सपोनि उत्तम भापकर, पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे व वैद्यकीय पथकाने खरशिंगे गावास भेट दिली.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देऊन खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत तसेच संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या तेवीस जणांना क्वारटाईन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान मागील दिड महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या खटाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने औंधसह परिसर हादरून गेला.
रात्री उशीरा याची माहिती मिळताच औंध येथील बाजारपेठ तीन दिवस लाँकडाऊन करण्यात आली आहे तसेच औंध परिसरातील अनेक गावातील सर्व व्यवहार ,वाहतूक ,अत्यावश्यक सेवा मंगळवारपासून तातडीने बंद करण्यात आल्या आहेत.