सातारा – सातारा जिल्ह्यात लहानमोठी २५० हून अधिक मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. माहे एप्रिल, मे व जून हे लग्नसमारंभ, रिसेप्शन्स् यासाठीचे महत्वाचे असतात. व यासाठी मोठया प्रमाणावर ॲडव्हान्स बुकींगही नागरीकांनी केलेले आहे. परंतु कोरोनच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहिर झाल्यामुळे सर्व सार्वजनिक समारंभ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून लॉकडाउनच्या काळात कर्मचारी वर्ग, बँकेचे हप्ते यामुळे अनेक व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
दरम्यान मार्च ते जून २०२० मध्ये आयोजित केलेले लग्नसमारंभ, रिसेप्शन्स व अन्य समारंभ रद्द झाल्यामुळे लग्नबुकींग केलेल्या नागरिकांनी ॲडव्हान्सची रक्कम परत मिळण्याबाबत तगादा लावलेला आहे. यामुळे असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या निर्णयानुसार बुकींग केलेल्या ग्राहकांना लॉकडाऊन उठविल्यानंतर व शासनाने परवानगी दिल्यानंतर बुकींग करण्याची संधी देत असून पुढील तारीख बुकींगसाठी देण्यात येत आहेत.
तसेच या कालावधीमध्ये ज्या ग्राहकांनी घरगुती पध्दतीने लग्न सोहळा पार पाडला असेल त्या ग्राहकांना बुकींग रक्कम परत न देता ग्राहकांचे नुकसान होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची रक्कम अॅडव्हान्समधून वजा न करता त्या रकमेची ग्राहकांना क्रेडीट नोट देण्यात येत आहे. यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कोणतीही तारीख आपल्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी व मित्रपरिवारासाठी लग्न बुकींग किंवा अन्य कार्यक्रमांसाठी वापरता येईल अशी अभिनव कल्पना असोसिएशनतर्फे सादर करण्यात आली आहे.
लॉकडाऊन नंतरच्या काळातही सोशल डिस्टनसिंगच्या अटीशर्ती पूर्ण करून मंगलकार्यालय व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्याची परवानगी मिळावी व मंगलकार्यालय व त्यांच्याशी संलग्न असलेल्या व्यावसायिकांना मदत करावी या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना मंगल कार्यालय असोसिएशनतर्फे देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी व सद्स्य उपस्थित होते.
लॉक डाऊनमुळे मंगल कार्यालये संकटात ; सातारा जिल्हा मॅरेज हॉल आणि लॉन असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
RELATED ARTICLES