सातारा : तुपेवाडी (ता. खटाव) मध्ये सायकल दुरुस्त करणारा तरुण दादासो बाबुराव काळे (वय ४०) यांनी सावकारी जाचातून गळफास घेऊन आत्महत्या केली.संपुर्ण गावात सदर आत्महत्येचे कारण समजावे म्हणून सोशल मीडियावर माहिती दिली.पण, त्याला कोणी आत्महत्या पासून रोखू शकले नाही.यापूर्वी ही खटाव तालुक्यात आत्महत्या व खुनाचे प्रकरणे घडली असून खाजगी सावकाराची लॉबी डोईजड झाली आहे.या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारे पोलिसांनी तपास केला पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.
या बाबत मिळालेली माहीती अशी की, तुपे वाडी येथील दादासो काळे यांचे कातरखटाव येथे रस्त्यालगत सायकल दुरुस्तीचे दूकान आहे. दुकानात ये-जा करणाऱ्या शिवाजी उत्तम कदम या तरुणाशी मैत्री झाली होती. गप्पा मारत असताना दादासो काळे याने पत्नी आजारी पडल्याने त्यांना तीस हजार रुपयांची गरज असल्याचे श्री कदम यांना सांगितले व तीस हजार रुपयांची मागणी केली. त्याच्या बदल्यात काळे यानी पत्नीची बोरमाळ, कानातील फुले, ठुशी व स्वताची चैन असे चार तोळयाचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. हे दागिने आनंदा बागल यांच्याकडे ठेवून त्यांच्याकडून तीस हजार रुपये उचलले होते. एक वर्षानंतर काळे यांनी दुसरे सोन्याचे दागिने गहाण ठेवून तसेच एल. आय. सी.च्या पावतीवर कर्ज घेवुन रक्कम जमा करुन श्री कदम यांच्या कडे सर्व रक्कम परत केली. सर्व रक्कम परत दिल्याने काळे यांनी मित्राजवळ ठेवलेल्या सर्व दागिने परत मागितले. त्यांनी आजपर्यंत ते दागिने काळे यांना परत दिले नाहीत. काळे यांच्या पत्नीने दागिने मागणीसाठी मित्राला फोन केला तेव्हा त्यांनी आरे- तुरे ची भाषा वापरली. काळे यांनी स्वतः फोन केला “तुला काय करायचे ते कर, मी कुणाला भीत नाही” अशी मित्राने धमकी दिल्याने दादासो काळे यांना मानसिक धक्का बसला. त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गावातील मोबाइल ग्रुपवर मेसेज टाकला, त्यानंतर तुपेवाडी तील इनाम मळा शिवारात पिपरणीच्या झाडावर चडून स्वतःच्या गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
“मी माझे बरेवाईट करुन घेत आहे, या सर्व विषयाला दोघे कारणीभुत आहेत, माझ्या परस्पर घरातील लोकांना न्याय मिळावा. त्यांचे मोबाईलवरील बोलणे रेकॉर्ड केले आहे असा मोबाईल मेसेज असल्याची चर्चा होत आहे.या प्रकरणी वडूज पोलिसठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक मालोजीराजे देशमुख करत आहेत.दरम्यान, सावकाराची दहशत व पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेकांनी तो मोबाईल डिलीट करण्यात धन्यता मानली आहे. खटाव तालुक्यात राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका सहकार्य करीत नसल्याने अनेक युवक व बेरोजगार तरुण खाजगी सावकाराकडून जादा व्याजाने कर्ज घेत आहेत. त्यामुळे आत्महत्या नसून नियोजित खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खटाव तालुक्यातून होऊ लागली आहे.