Homeसातारा जिल्हाकराडसातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात;...

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; संघटन बळकटीचा निर्धार

 सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण व सत्कार सोहळा हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते नामदेवराव पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश प्रवक्ते हनमंत पवार, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील व राजेंद्र शेलार, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, श्रीकांत चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, बाबुराव पवार, बाबासाहेब कदम, इंद्रजीत चव्हाण, संजय तडाखे, जयदीप शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी अजितराव पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धैर्यशील सुपले यांनी केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, काँग्रेस पक्ष हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा रक्षक आहे. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई, शेतकरी, उद्योग आणि सामाजिक सलोखा यांसारखी अनेक गंभीर आव्हाने आहेत. अशा काळात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. सातारा जिल्ह्याला काँग्रेसचा वैभवशाली वारसा लाभला असून नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रत्येक गावात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की, सातारा जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास आहे. “मला मतं दिली तर लाडका भाऊ, नाही दिलं तर ती नावडती बहीण,” अशा मानसिकतेचे सरकार राज्यात आहे. स्वतःला ‘देवाभाऊ’ म्हणवून घेणारे मुख्यमंत्री महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत मौन का बाळगतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी आणि सीमासुरक्षेच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आरएसएस, राष्ट्रभक्ती आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या भाषणात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित केला. ते म्हणाले की, अनेक दिग्गज नेत्यांनी या जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. आज जिल्ह्यातील आठही आमदार विरोधी पक्षात असले तरी त्यांची राजकीय जडणघडण काँग्रेसमधूनच झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून नव्या पिढीला पक्षाशी जोडण्याचे काम करण्याची गरज आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्रासह देशाला नेतृत्व दिले असून पुन्हा एकदा सातारा काँग्रेसच्या बळावर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “2014 पूर्वीचा आणि त्यानंतरचा भारत अशी देशाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा विचार आजही जिवंत आणि मजबूत राहिला आहे.”
यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भानुदास माळी यांचा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना भानुदास माळी म्हणाले, “सामान्य कार्यकर्त्यांशी आपुलकीचा संवाद साधणे ही आदरणीय पृथ्वीराज बाबांची कार्यपद्धती आहे. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे ही त्यांची कायमची भूमिका असून त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे.”
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी कामातून सार्थ ठरवेन. आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संघटन वाढविणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष अधिक मजबूत करणे, हेच माझे ध्येय राहील.”
कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल तसेच हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ( माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण सोहळा पार पडला
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular