सातारा:- NEET परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाने देशभर खळबळ उडाली असताना सातारा शहरातील सुजाण नागरिक, विद्यार्थी, पालक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच शिक्षणतज्ज्ञ व जेष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा असलेले निवेदन सातारा जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांच्याकडे, राजेंद्र चोरगे, चित्रा दाभोलकर, विलासबाबा जवळ, डॉ. धनंजय देवी, ॲड. अमित द्रविड, मेघना बाफना, संजय कदम, जगदीश खंडेलवाल व श्रेणिक शहा यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत NEET, JEE, SSC, TET सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे मेहनती विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असून नैराश्यातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडाला असून हे भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने विपरीत पाऊल आहे.
शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे NEET पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी साताऱ्यातील सामाजिक संस्था व नागरिकांनी नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. सदर निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय यांना सुद्धा ही पाठवण्यात आले आहे.
*निवेदनातील प्रमुख मागण्या:*
1. सोनम वांगचूक यांच्याशी तातडीने चर्चा करून त्यांच्या मागण्या कालबद्ध पद्धतीने मान्य कराव्यात.
2. NEET पेपर फुटी सारख्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करून दोषींना कडक शिक्षा द्यावी.
3. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा.
4. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन केंद्रे सुरू करावीत व सार्वजनिक शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६% खर्च करावा.
शिक्षण क्षेत्र हे देशाचे भविष्य घडवते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटी होत असताना संबंधित यंत्रणेने जबाबदारी झटकणे भूषणास्पद नाही, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. या लोकशाही मार्गाने केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करावा अशी विनंतीही उपस्थित मान्यवरांनी केली आहे.

