कराड : कराड अर्बन बँकेच्या कामकाजावर ग्राहकांचा अढळ विश्वास असल्यानेच बँकेची सर्वांगीण प्रगती साध्य झाली आहे, ग्राहकांच्या या प्रेमामुळेच बँकेने दिवाळीच्या सणानिमित्त वाहन व गृहकर्जावरील व्याजदर कमी केले असून ग्राहकांना आता 9.50% व्याजदराने गृहकर्ज व वाहन कर्ज उपलब्ध होणार असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
बँकेने घरतारण, घर खरेदी, घरबांधणी, घरदुरूस्ती साठी रू. 25 लाख पर्यंतच्या कर्जासाठी 9.50% तर रू.25 लाखावरील कर्जासाठी 10% व्याजदर केला असून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतात. वैयक्तीक वापरासाठीच्या दुचाकी व चारचाकी वाहनासाठी 9.50% व्याजदर तरी व्यावसायिक वापरासाठीच्या वाहन कर्जासाठी 13% व्याजदर केला आहे.
यावेळी पुढे बोलताना डॉ. एरम पुढे म्हणाले की, बँकींग क्षेत्रातील वातावरण सातत्याने बदलत असले तरी कराड अर्बन बँकेचा ग्राहक सातत्याने वाढत आहे. पार्श्वनाथ बँकेच्या यशस्वी विलीनीकरणानंतर बँकेने अजिंक्यतारा सहकारी बँक व अजिंक्यतारा महिला सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले, त्यामुळे बँकेचा शाखाविस्तार झालेला आहे. त्यामुळे बँकेची गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली आहे.
याप्रसंगी बोलताना अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले की, कराड अर्बन बँक ही सामाजिक बांधिलकी कृतीतून जपणारी बँक असून बँकेने आजवर अंध-अपंग यांच्यासाठी शिबीरे, रक्तदान शिबीरे याबरोबरच युवकांनी उद्योजक व्हावे यासाठी उद्योजकता शिबीराचे आयोजन दरवर्षी केले आहे आणि अनेक गरजूंना याचा उत्तम लाभ झाला आहे. बँकेने शताब्दीची आठवण कायम रहावी यासाठी अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त अशा शताब्दी सभागृहाची निर्मिती केली. यामुळे कराडच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितपणे भर पडली आहे.
बँकेने शताब्दी महोत्सवाचा विचार करून तयार केलेल्या व्हीजन डॉक्युमेंट 2017 नुसार केलेल्या योग्य नियोजनामुळे या आर्थिक वर्षामध्ये बँकेने ठरविलेल्या सर्व उद्दीष्टांची पूर्तता झाली. कोअर बँकींग प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञान यांच्या आधारे सर्वोत्तम ग्राहकसेवा देत बँकेने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे असेही यावेळी बोलताना सुभाषराव जोशी यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव म्हणाले की, बँकेचे अर्थकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असून देशात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात बँकेने हातभार लावला आहे. बँकेने शताब्दी वर्षामध्ये शाळा, महाविद्यालये, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे तसेच हॉस्पिटल्स अशा सुमारे दोन हजार ठिकाणी डस्टबीनचे वाटप केले असून बँकेच्या कराड शहरातील शाखांमधील कचरा गोळा करण्यासाठी बँकेने वाहनाचीही व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कराड अर्बन बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव बँक आहे.
सहकारी बँकिंग क्षेत्राच्या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर कराड अर्बन बँकेने केलेली वाटचाल आणि बँकेची प्रगतीची घोडदौड कायम असल्याचे दिसून येते. बँकेचे समर्पित भावना असलेले आणि उच्चशिक्षित असे संचालक मंडळ, अनुभवी, ज्ञानसंपन्न व सेवातत्पर सेवकवर्ग, भविष्यकाळाचा अचूक वेध घेत केलेले नियोजन, आर्थिक मापदंड/निकषांचे तंतोतंत पालन आणि व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबर आधुनिकतेची धरलेली कास या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे बँकेची आजची प्रगती आहे. बँकेच्या या वाटचालीत कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव आणि संचालक मंडळ सदस्य यांचे अभ्यासपूर्ण योगदान आहे.
कराड अर्बन बँकेच्या कमी व्याजदराचा लाभ घ्या : डॉ. एरम
RELATED ARTICLES