सातारा, दि. 27 (प्रतिनिधी)- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केला आहे., 26 जानेवारीला या मागणीसाठी नवी दिल्ली येथे होणा-या धरणे आंदोलनाचे नेतृत्व आपण शिवछत्रपतींचा वारसदार या नात्याने करणार आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खासदार उदयनराजे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे तसेच लोकसभेत हा प्रश्न मांडावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर खासदार संभाजीराजेंनी याबाबत पंतप्रधानाकडे पाठपुरावा करावा. सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठीप्रेमींनी पंतप्रधान मोदीपर्यंत ही गोष्ट पोहचवावी. मराठी बांधवांनी प्रचंड संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ङ्गएखाद्या रोग्याची नाडी पकडून तज्ज्ञ लोक त्याच्या प्रकृतीविषयी भाष्य करतात, त्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्रातील भाषेवरून त्या-त्या राष्ट्राच्या सामर्थ्याची कल्पना येते. छत्रपती शिवरायांपूर्वी पोवाडे का झाले नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजेच मराठी भाषेचा अभ्युदय होय,फ असे लोकमान्य टिळकांनी ङ्गकेसरीफमधील अग्रलेखात लिहिले होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा 11 कोटी मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत माझ्याहस्ते मराठी अभिजात भाषा देण्यासाठीच्या मोहिमेचा शुभारंभ सातारा येथे झाला होता. त्यावेळी मसाप प्रतिनिधी विनोद कुलकर्णी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा अभिजात समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला होता. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध होईल आणि मराठीच्या विकासाला चालना मिळेल. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ या सातारकर मंडळींनी पुढाकार घेऊन चळवळ उभी केली, ही क्रांतिकारकांचा वारसा लाभलेल्या साता-याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. म.सा.प.चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह प्रा. रंगनाथ पठारे यांनीही या पुढाकाराचे कौतुक केले असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आता या मागणीसाठी 26 जानेवारीला आपण सर्व मराठीजनांनी दिल्लीला धडक द्यायची असून, या आंदोलनाचे नेतृत्व शिवछत्रपतींच्या घराण्याचा वारसदार म्हणून मी स्वीकारले आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी म.सा.प.च्या शाहूपुरी शाखेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्रे पाठविण्यात आली होती. त्याचप्रमाणे म. सा. प. चे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने पाठविले होते. मात्र, ही याचिका फेटाळल्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयानेच कळविली होती. पुढील कार्यवाही सुरू झाली असून, याबाबत ङ्गकॅबिनेट नोटफ तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही कळविले होते. या घटनेला आता सहा महिने झाले आहेत. केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी हवी आहे. या शेवटच्या टप्प्यासाठी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत धरणे आंदोलनाचा निर्णय म.सा.प.ने घेतला असून, त्याद्वारे पंतप्रधानांचे लक्ष या विषयाकडे वेधले जाणार आहे. या आंदोलनाला खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी सक्रीय पाठिंबा देऊन लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान सुरुची राडा प्रकरणानंतर प्रथमच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदारांना आवाहन केल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. यावेळी त्यांनी खासदार संभाजीराजे यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर मराठी बांधवांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याविषयी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना टॅग करावे तसेच अन्य सोशल मिडियाच्या व्यासपीठावरुन लक्ष वेधावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रस्तावित आंदोलनास दिल्लीला जाण्यासाठी साता-यातील साहित्यिक राजेंद्र माने, उमेश करंबेळकर, अॅड. चंद्रकांत बेबले, संतोष यादव यांच्यासह अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण आदी 25 जणांनी बुकिंगही केले असून, म.सा.प.च्या या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी विनोद कुलकर्णी यांनी केले. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी साहित्य परिषदेच्या सर्वच उपक्रमांना पहिल्यापासून पाठिंबा दिला असून, या लढ्याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारल्याबद्दल साहित्य परिषदेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचा दिवस जवळ आला असून, अंतिम धडक मारण्यासाठी सर्व भेदाभेद विसरून या राजकारणविरहित लढ्यासाठी मराठीजनांनी कंबर कसावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व खासदारांशी याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांना पत्र पाठविणार तर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार
म.सा.प.च्या पदाधिका-यांनी आपल्याला विनंती केल्याबरोबर या संघर्षाचे नेतृत्व तयार करण्याची तयारी मी दर्शविली, असे सांगून आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आंदोलन शांततामय मार्गाने केले जाईल; परंतु मुळात केंद्र शासनाने आंदोलनाची वेळ आणू नये अशीच आमची इच्छा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही पाठविणार असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयास आंदोलनापूर्वीच मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी, अशी विनंती पत्रात करणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे संजय राऊत यांच्याशीही याबाबत चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नेहमीच चांगल्या सामाजिक, राजकीय गोष्टीला पाठिंबा राहिला आहे. पक्ष न बघता ते ठामपणे पाठिंबा देतात त्यामुळे याप्रश्नी त्यांच्याशी चर्चा करणार असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी विनंतीही करणार असल्याचेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी या आंदोलनाला दिल्लीतील मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची स्वीय सहाय्यकांनी याबाबत केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याबरोबर चर्चा घडवून आणून असे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी किशोर बेडकिहाळ, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, उद्योजक संतोष यादव, नगरसेवक अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, प्रवीण पाटील, मसाप शाहुपुरीचे डॉ. उमेश करंबळेकर, अॅड. चंद्रकांत बेबले, नंदकुमार सावंत, सचिन धुमाळ, वजीर नदाफ आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.