सातारा: थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरले आहे. त्यांचे विचार आत्मसात करुन ते नव्या पिढीपर्यंत पोहोचविले पाहिजे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज केले.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व नायगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन व मत्सविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर, आमदार मनिषा चौधरी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदी यावेळी उपस्थित होते.
नायगाव हे स्त्री शिक्षणाचे तीर्थक्षेत्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन विधान परिषद सभापती श्री. नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, फुले दांपत्यांनी एक आदर्श विचार समाजाला दिले आहेत. त्यांच्या विचारांवर चाललो तर आज देश खुप पुढे जाईल. त्यांच्या विचार प्रत्येकाने आचारणात आणले पाहिजे, असे आवाहन करुन सावित्रीबाईंच्या विचारांची देवान-घेवाण होण्यासाठी हा जयंती कार्यक्रम एक आठवड्याचा घ्यावा. फुले दांपत्याला भारतत्नाने सन्मानित करण्यात यावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. नायगाव परिसरात महिलांसाठी विद्यापीठ निर्माण करावे. असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुली व महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी शासन सकारात्मक आहे. फुले दांपत्यांचे कार्य पाहता राज्य शासनाने भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. माझ्याकडे राजशिष्टाचार विभाग असल्याने मी स्वत: यापुढे या पुरस्कारासाठी पाठपुरवा करणार आहे. नायगावचा जलयुक्त शिवार अभियानांत समावेश करण्यात आला असून या नदीपुर्नजीवन योजनेतून सिमेंट बंधार्यासाठी निधी दिला जाईल. फुले दांपत्यांच्या विचारांनुसार शासन काम करीत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
नायगाव येथील विकासकामांबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे लवकरच एक बैठक घेऊ. नायगाव येथील विकास कामांबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी दिले.
यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, फुले दांपत्यांच्या विचारावर आपण चालत आहोत का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आत्ताही आपल्या समाजात जुन्या रुढीचा अवलंब केला जातो. मुलगी झाली तर कुटुंबातील नाराज होतात. हे चित्र बदलले पाहिजे. वंश फक्त मुलगाच चालवतो ही समजुन समाजातून नष्ट झाली पाहिजे. मुलगी आपला वंश पुढे नेऊ शकते या भावना समाजात रुढ झाल्या पाहिजे. यासाठी प्रत्येक कुटूंबाने मुलींना शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे, हीच करी फुले दांपत्यांना श्रद्धांजली ठरेल. मी 2010 मध्ये फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अशासकीय ठराव मांडला होता. नायगाव या ठिकाणी वंचित महिलांसाठी आधार केंद्र उभे करण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्वासनही त्यांनी शेवटी त्यांनी शेवटी दिले.
महिलांनी आपले हक्क मिळविले पाहिजेत – जिल्हाधिकारी
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहे. फुले दांपत्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची दारे खुली करुन दिली. फुले दांपत्यांच्या नुसते विचार ऐकू नका तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून आपले हक्क मिळविले पाहिजे. मुलगी शिक्षीत झाली तर पूर्ण कुटूंब शिक्षीत होते. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपले कौशल्य विकसीत करुन आर्थिक प्रगती साधली तरच त्यांना समाजात मानाचे स्थान मिळेल. यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद योग्य ती मदत करेल, अशी शाश्वती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे, पंकज भुजबळ, योगेश टिळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक नितीन भरगुडे-पाटील यांनी केले तर. प्रास्ताविक नायगावचे सरपंच निखील झगडे यांनी केले. या कार्यक्रमास प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार विवेक जाधव, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, गट विकास अधिकारी दीपा बापट, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.