सातारा : नुकताच प्रदर्शित झालेल्या बारायण चित्रपटात संभाजीराजेंच्या गंभीर प्रसंगाचे भावनिक भांडवल करत राजेशिर्के घराण्याची बदनामी केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यांनी केलेला हा खोडसाळपण संतापजनक व निषेधार्ह असून या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.
प्रसिध्दीपत्रकात सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी पुढे असे नमूद केले आहे की, हल्ली मालिका आणि चित्रपटांमध्ये खोटं दाखवायचे, पण रेटून दाखवायचे असा ट्रेंड सुरु झाला आहे. किमान ऐतिहासिक स्वरुपाची एखादी कलाकृती, नाटक किंवा चित्रपट आपण तयार करतो तेव्हा तरी इतिहासाचा विपर्यास होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी. जर कोणी विपर्यास आधीच केला असेल तर तो दुरुस्त करण्याची मानसिकता असायला हवी. तथापि, दिग्दर्शक वा निर्माता यांच्याकडून ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसते आहे, हे चित्रपट बारायणवरुन समोर आले आहे.इतिहासातील वस्तुस्थिती काय? खरे काय – खोटे काय याचे वस्तुनिष्ठ तपासण्यात दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला इंटरेस्ट नसतो काय, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे ! बारायण या चित्रपटाने समस्त राजेशिर्के घराण्याची बदनामी केली आहे. त्यामुळे समाजातील राजेशिर्के घराण्याची प्रतिष्ठा व मानसन्मानास बाधा पोहचली असून महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातसह अन्य राज्यातील तमाम राजेशिर्के घरांण्याच्या भावनेशीच चित्रपट बारायणने खेळ खेळला आहे. या आम्हा राजेशिर्के घराण्यांना मानसिक धक्का बसला असून दिग्दर्शक व निर्माता यांनी शक्य तेवढ्या लवकर माफी मागावी. राजेशिर्के घराणे हे पुर्वीपासून ते आजपर्यंत छत्रपती राजघराण्याशी अत्यंत निष्ठेने राहिले आहे. दिपक पाटील बारायण चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी संभाजीराजेसंदर्भातील प्रसंग दाखवताना अयोग्य माहिती दाखवून विपर्यास का केला हे कळून येत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यापूर्वीच व महाराष्ट्रातील राजेशिर्के घराणे यांचा असंतोष विकोपाला जाण्यापूर्वीच चित्रपटाचे प्रदर्शन शासनाने थांबवावे असे आवाहन सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी पत्रकाव्दारे केले आहे.