भुईंज : सहकार व राजकारणाला अध्यात्माची जोड असेल तर उत्तम समाजकारण होते. संत साहित्य, संतांचे विचार, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व लोकजागरण होण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याने गेल्या चौदा वर्षांपासून सुरू केलेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्यास कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद लाभला. हा अखंड नामयज्ञ सोहळा यंदा 15 व्या वर्षीही 22 ते 25 जानेवारीअखेर नामवंत कीर्तन-प्रवचनकार, थोर संत साहित्यीक, अभ्यासक, उपासक, साधक-भक्तभाविक आणि वारकर्यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. सोमवारी (दि.22) सकाळी साडे दहा वाजता पुणे येथील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे निवृत्त कुलपती, मुर्ती विज्ञानाचे तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते, प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या लागिरं झालं जी या मालिकेतील यशस्वी कलाकारांच्या तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नामयज्ञ सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सोमवार दि. 22 जानेवारीला सकाळी 8 वाजता कलश पुजनानंतर निघणार्या ग्रंथदिंडीत विविध वारकरी संघटना व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता अंबेरी मठातील (ता. कोरेगाव) ह.भ.प. आचार्य शिवानंदमहाराज यांच्या प्रवचनानंतर सात वाजता आंबेघर तर्फे मेढा येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. प्रविणमहाराज शेलार यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार दि. 23 रोजी दुपारी दोन वाजता पुण्यातील रोहित मराठे यांची भाव,भक्ती, नाट्य गीतांची मैफल होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता विसापुर (ता. खटाव) येथील कु.प्रियांकाताई कदम यांचे प्रवचन तर सात वाजता पुणे येथील ह.भ.प. सौ. रोहिणीताई माने-परांजपे यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दि.24 रोजी दुपारी दोन वाजता पंढरपुरातील जगन्नाथ वाडेकर यांचे दरबारी गायक कु. सुहास गवळी, समर्थ मांढरे, ओंकार चिकणे हे सांप्रदायिक भजन आणि पखवाज वादनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता पाडळी (ता. कराड) येथील ज्ञानेश्वरीचे अभ्यासक ह.भ.प. राजेंद्रमहाराज जाधव यांच्या प्रवचनानंतर नयनरम्य दिपोत्सवाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजता हडपसर पुणे येथील रामायण-भागवत प्रवक्ते ह. भ. प. माधवमहाराज रसाळ यांचे कीर्तन होणार आहे. गुरूवार दि. 25 जानेवारीला सकाळी 8 वाजता पालखी सोहळ्यानंतर नवगण राजूरी (ता.जि.बीड) येथील जगद्गुरूद्वारा आचार्य स्वामी अमृत आश्रमातील जोशीमहाराज यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसाद होऊन नामयज्ञ सोहळ्याची सांगता होणार आहे.
सोहळ्याचे व्यासपीठ ह. भ. प. चंद्रकांत महाराज उदावंत चालविणार असून दररोज सकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायाच्या पारायणासह चिंतन, सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री दहानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावांच्या भजनी मंडळाचा जागर होणार आहे. सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक वस्तु, धार्मिक ग्रंथ, संत साहित्य व धार्मिक कॅसेटच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. चार दिवस चालणार्या अखंड नामयज्ञ सोहळ्यात कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद, विविध वारकरी संघटना, भजनी मंडळे, कार्यकर्ते व भाविकांनी उपस्थित राहून या संत स्नेह मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व संचालक मंडळाने केले आहे.