Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसमाज माध्यमांच्या वापराबाबत पत्रकारांनी स्तंभलेखनाच्या माध्यमातून जनजागृती करावी : पोलीस अधिक्षक संदीप...

समाज माध्यमांच्या वापराबाबत पत्रकारांनी स्तंभलेखनाच्या माध्यमातून जनजागृती करावी : पोलीस अधिक्षक संदीप पाटील

सातारा : सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. देशातील पहिले महाराष्ट्र राज्य आहे की प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅबची स्थापना केली आहे. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. तरुण पिढीने विविध समाज माध्यमांचा स्वत:च्या, देशाच्या तसेच राज्याच्या विकासासाठी वापर करावा. यासाठी पत्रकारांनी स्वतंत्र स्तंभलेखनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करावी,  असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी आज केले.
जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत सायबर जनजागृती विषयक पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कदम आदी यावेळी उपस्थित होते.
सध्या डिजीटल युग आहे. या युगामुळे समाज माध्यमांचा वाढता वापर   असून यातून गुन्ह्यांचेही प्रमाणही वाढणार आहे. समाज माध्यमांच्या वापराबाबत  प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. प्रिंट मीडियाने तर समाज माध्यमांच्या वापराबाबत स्वतंत्र लेख किंवा बातम्या देवून तरुणांमध्ये जनजागृती करावी. व्हॉटस्प वापरणार्‍यांमध्ये तरुणांचे प्रमाणही खूप आहे.  समाज माध्यमांवर कोणताही मजकुर आल्यावर त्याची प्रथम शहानिशा करावी.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तो मजकुर पुढे पाठवू नये. त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.
छोटेसे चित्रीकरणही समाजामध्ये तेढा निर्माण करु शकते. पत्रकारांनी समाज माध्यमांचा वापर समाज हितासाठी करावा. पत्रकारिता  हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही समाज माध्यमांवर बातम्या टाकताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. युवा पिढीनेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे मजकुर समाज माध्यमांवर टाकू नयेत , असे केल्यास पोलीस विभागामार्फत  कारवाई  होवू शकते.  तरुण पिढीने समाज माध्यमांचा वापर हा समाज हितासाठी करावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शेवटी केले.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील म्हणाले, पत्रकारांना सायबर कायदाची माहिती व्हावी यासाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 वर्षापूर्वी सायबर कायदा अस्तित्वात आला. या सायबर गुंह्यामध्ये गुन्ह्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. देशात 2014 मध्ये 9 हजार 622, 2015 मध्ये 11 हजार 592 व 2016 मध्ये 12 हजार 317 इतके पोलीस ठाण्यात सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. सायबर सेलची स्थापना महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात केलेली आहे. सायबर गुन्ह्यामध्ये 18 ते 34 वयोगटातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. समाज माध्यमांच्या वापराबाबबत जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागाच्या मदतीने जनजागृती करत आहे. तरुण पिढीने समाज माध्यमांचा वापर समाज हितासाठी करावा यासाठी पत्रकारांनी आता  मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी , असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
या कार्यशाळेत सहायक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, त्यावर पोलीस विभाग सायबर लॅबच्या माध्यमातून काय कारवाई करते याबाबत विविध दाखले देवून व संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सांगितली. या कार्यशाळेस पत्रकार तसेच पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular