मेढा :जावली तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेला पाठवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.
जावली पंचायत समितीच्या आखाडकर सभागृहात तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी जावलीच्या सभापती अरुणा शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, सदस्य सौरभ शिंदे, विजय सुतार, कांताबाई सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते.
मानकुमरे म्हणाले,प्रत्येक गावचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. तसेच ग्रामसचिवालय,दलित वस्ती सुधारणा, स्मशानभूमी शेड, रस्ते, ज्या गावांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते त्यांची पुर्वतयारी करावी.पाण्याची कमतरता भासते अशा गांवानी आत्ताच नळपाणी पुरवठ्याचे प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या समितीच्या मिटींगमधे प्रस्ताव घ्यावा लागतो.त्यामुळे लवकरात लवकर आपआपल्या गावाचे प्रस्ताव पाठवा. बर्याच गावांना ग्रामसेवकांना चार पाच गावांना एकच ग्रामसेवक दिल्यामुळे विकास कामात अडचणी निर्माण होत आहेत. तो प्रश्न सुध्दा संबधित अधिकार्यांनी लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना दिल्या.