सातारा : जावली व महाबळेश्वर तालुक्यातील अतीदुर्गम व डोंगराळ भागातील गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने कोयना नदीवर तापोळा ते अहिर या पुलास मंजुरी मिळाली आहे. याच धर्तीवर जावली तालुक्यातील 38 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 25 गावे जोडली जावीत यासाठी तापोळा ते केळघर, आपटी असा सोळशी नदीवर नवीन पुल उभारावा अशी मागणी आपटी येथे एका लग्न समारंभात ग्रामस्थांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीचा तातडीने पाठपुरावा करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ना. शिंदे यांच्या सहकार्याने सोळशी नदीवर तापोळा ते केळघर, आपटी या नवीन पुलाचाही मार्ग मोकळा करुन दिला आहे.
ना. शिंदे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार सदर नवीन पुलाचा तातडीने सर्व्हे करण्याच्या सुचना संबंधीत विभागास दिल्या. यामुळे या नवीन पुलाचे काम मार्गी लागण्यास चालना मिळाली आहे. यामुळे जावलीतील केळघर तर्फ सोळशी, आपटी, निपाणी, तेटली, म्हावशी, बामणोली, कोडगळ, पावशेवाडी, अंधारी, फुरुस, वाकी, रामेघर यासह 38 ते 40 गावे तापोळा आणि महाबळेश्वरला जोडली जाणार आहेत. तसेच या नवीन पुलामुळे महाबळेश्वर तालुक्यातील 25 दुर्गम गावांचा दळणवळाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. आठ दिवसापुर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपटी येथील एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी राम पवार, यशवंत आगुंडे, निलेश शिंदे, शंकर साळुंखे, राजेंद्र सपकाळ, आपटीचे सरपंच नामदेव कदम, किसन भोसले, गेणू कदम, सखाराम कदम आदी कार्यकर्ते आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे तापोळा ते केळघर, आपटी असा नवीन पुल सोळशी नदीवर बांधल्यास दळणवळचा मार्ग सुकर होईल, त्यामुळे सदर पुल बांधून द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत आपण पाठपुरावा करु, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांना त्यावेळी दिला होता. दिलेला शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी असा नावलौकिक असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सकारात्मक कार्यपध्दतीची एक झलक जावलीकरांना यानिमीत्ताने पहायला मिळाली. अधिवेशनासाठी मुंबईत गेल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत ग्रामस्थ आणि मुबंईत राहणार्या जावलीतील ग्रामस्थांना बुधवारी मंत्रालयात बोलावून घेतले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित ग्रामस्थांची ना. एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली. समस्त जावलीकरांची अडचण समजून घ्यावी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सोळसी नदीवर तापोळा ते केळघर, आपटी असा नवीन पुल बांधावा, त्याला मंजूरी द्यावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. शिंदे यांच्याकडे केली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ना. शिंदे यांनी सोळशी नदीवर नवीन पुल बांधण्यासाठी तातडीने सर्व्हे करावा आणि त्याचा अहवाल त्वरीत साधर करण्याबाबत संबंधीत अधिकार्यांना सांगितले. त्यामुळे तापोळा ते केळघर, आपटी या नवीन पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जावली तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे चालना मिळाली आहे. सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामास मंजुरी मिळवून लवकरात लवकर पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करु, असे आश्वासनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. जावलीतील महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. शिंदे यांचे आभार मानले तर, जावलीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करुन प्रश्न तडीस नेल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे ग्रामस्थांनी आभार मानून समाधान व्यक्त केले.
तापोळा ते केळघर, आपटी या नवीन पुलाचा मार्ग मोकळा ; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरुन ना. एकनाथ शिंदे यांचा हिरवा कंदील
RELATED ARTICLES