सातारा : फलटण तालुक्यातील सोनगावच्या वयोवृद्ध माने दांपत्याच्या चंद्रमौळी झोपडीत रॉकेलवर चालणारा मिणमिणता दिवा हाच रात्रीच्या अंधारात उजेडाचा एकमेव आधार होता. हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना वीजजोडणी घेता आली नव्हती. मात्र महावितरणने सौभाग्य योजनेतून नुकतीच माने दांपत्यास मोफत वीजजोडणी दिली. आयुष्याच्या उत्तरार्धात विजेचा प्रकाश मिळाल्याने माने दांपत्याच्या घराबरोबरच त्यांचा चेहराही आनंदाने उजळून निघाला.
फलटणपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर बहुसंख्य दलित वस्ती असलेलं पावणेचारशे उंबरठ्याचं सोनगाव. शेतमजुरी हेच बहुतेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन. त्यामुळे काही घरात स्वातंत्र्यानंतरही वीज पोहोचू शकली नव्हती. वीजजोडणी घ्यायची म्हटली तरी त्यासाठी पैसे आणायचे कुठून असा यक्षप्रश्न अनेकांसमोर पडलेला. रॉकेलवर तेवणारी चिमणी अन् कंदिलाचा अंधुक प्रकाश हेच त्यांचं प्रारब्ध होतं. गावाच्या कोपर्यात राहणार्या यशोदा व श्रीरंग माने या सत्तरी पार केलेल्या दांपत्याच्या घरातही वीज नव्हती. रॉकेलवरील दिव्याच्या प्रकाशातच त्यांचं अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य सरलं. या दांपत्यानं दोन विवाहित मुलं. पण रोजगाराच्या शोधात दोघंही दुसर्या जिल्ह्यात स्थलांतरित झाले.
उतारवयात एकमेकांना आधार देत माने दांपत्य एकेक दिवस पुढे ढकलत होते. रॉकेलचा दिवाही कधी दगा द्यायचा. दिव्यातलं रॉकेल संपलं की ते आणायला पायपीट होत असे. ते सहजासहजी मिळालं तर ठिक, नाहीतर रात्र तशीच अंधारात काढावी लागे. पावसाळ्यात तर जास्तच हाल. वादळवार्यात रॉकेलचा दिवाही विझायचा. अशावेळी आसपासच्या घरांतले विजेचे दिवे पाहून आपल्याही घरात वीज असती तर किती बरं झालं असतं, असा विचार या दांपत्याच्या मनाला स्पर्शून जायचा. पण स्वप्न व सत्यात अडसर होता तो आर्थिक परिस्थितीचा. श्रीरंग माने आता वयोमानानुसार थकले आहेत. त्यातून बर्याच वेळा ते आजारी असतात. मुलं आपल्या संसारात रममाण झाल्यानं यशोदा माने यांच्यावरच दोघांच्या संसाराचा गाडा चालवण्याची जबाबदारी. मिळेल ते मजुरीचे काम करून त्यावर दोघांची गुजराण होते. त्यामुळे इच्छा असूनही माने दांपत्य वीजजोडणी घेऊ शकत नव्हतं. वीजजोडणीचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहतं की काय, अशी चुटपूट त्यांना लागायची.
अशातच 11 एप्रिल 2017 ची सकाळ त्यांच्या आयुष्यात स्वप्नपूर्तीची आस घेऊन आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंतीनिमित्त केंद्र सरकारने ग्रामस्वराज्य अभियानातून विजेपासून वंचित असलेल्या मागास नागरिकांना सौभाग्य योजनेतून वीज देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 11 तारखेला महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप, उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी, शाखा अभियंता प्रदीप थोरात, बाह्यस्रोत कर्मचारी संदीप जगदाळे, तंत्रज्ञ नीलेश कोकरे, के.डी. पावरा यांनी सोनगावात बैठक घेऊन सर्वेक्षण केले. त्यात माने दांपत्यासह 65 घरे वीजजोडणीपासून वंचित असल्याचे आढळून आले. यातील एकही घर अंधारात राहू नये म्हणून महावितरणने सोनगावात तीनवेळा लाभार्थ्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या. या लाभार्थ्यांना 5 मेपर्यंत वीजजोडणी देण्याची कालमर्यादा शासनाने निश्चित केली होती. परंतु श्री.सूर्यवंशी व त्यांच्या सहकार्यांनी रात्रीचा दिवस करत मुदतीपूर्वीच काम पूर्ण केले. तब्बल 11 नवीन खांब व तारा बसवून 65 घरांत त्यांनी प्रकाश पोहोचवला.
माने दांपत्य दारिद्र्यरेषेखालील असल्याने त्यांना मोफत वीजजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकून आपल्याला एकही पैसा खर्च न करता वीज मिळणार, आता घरातला अंधार कायमचा दूर होणार या विचाराने यशोदा माने हरखून गेल्या. सर्वेक्षणानंतर दोन दिवसांतच हातात विजेचे मीटर घेऊन घराबाहेर उभे असलेले वीज कर्मचारी पाहताच यशोदा माने यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अवघ्या दोन तासांत घराबाहेरच्या लाकडी मेढीवर बसवलेले विजेचे मीटर एखाद्या सौभाग्य लेण्यासारखे चमकू लागले. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर यशोदा माने यांनी बटन दाबताच दिवसाही एलईडी दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघाले. त्यांचा आनंदी चेहरा पाहून महावितरणच्या कर्मचार्यांनाही कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळाले.
घरात वीज आणण्याचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल माने दांपत्याने महावितरण व सौभाग्य योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मवीजजोडणीसाठी महावितरणकडे जावं लागलं नाही तर अधिकारीच माझ्या दारी आले आणि माझं घर उजळून निघालं. आता माझी मुलं, सुना अन् नातवंडं जेव्हा घरी येतील, तेव्हा त्यांना अंधारात राहावं लागणार नाही. लाईट आल्यामुळं आता विचूकाट्याची भीती राहिली नाही. आता उजेड आलाय, हे सांगताना यशोदा मानेंच्या चेहर्यावरचा आनंद शब्दातीत होता.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर व सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय साळे यांनी फलटण ग्रामीण उपविभागाच्या चमूला वेळोवेळी मार्गदर्शन करून विद्युतीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुदतीपूर्वीच काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी फलटण ग्रामीण उपविभागाचे कौतुक केले.
अन् चंद्रमौळी झोपडीत पोहोचला प्रकाश !, महावितरणच्या सौभाग्य योजनेची किमया
RELATED ARTICLES