पाटण :- (शंकर मोहिते.)पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून. वर्षभर पुरेल इतकही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल याची शाश्वती राहिली नाही. तर गुरांच्या वैरणीचाही प्रश्र्न गंभीर झाला आहे. पावसाच्या आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी सर्व पक्षीय तालुका अध्यक्ष्यांना एकत्र घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन दिले. व पाटण तालुक्यातील ओला दुष्काळ व पाऊसा संदर्भातील परिस्थिती उपजिल्हाधिकारी यांना सांगितली.
यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, आर.पी.आय.चे. पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा. रविंद्र सोनावले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास हादवे, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य रामभाऊ लाहोटी, संजय सत्रे, शंकरराव कुंभार, अनिल बोधे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटण तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन केले. होते.
पाटण तालुक्यात ७ जून पासून सलग अडीच महिने मुसळधार पाऊस सुरू आहे. १५ जुलै पासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. या वरून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचे स्वरूप लक्षात येते. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, ऊस, नाचणी, मुग, तूर आदी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत. तर काही ठिकाणी वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना वर्षभर जगण्यासाठी पुरेल इतके ही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल अशी परिस्थिती यंदाच्या पाऊसाने ठेवली नाही. गुरांना वर्षभर मिळणारी वैरण देखील नष्ट झाली आहे. या सतच्या पाऊसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल करून सोडले आहे. अजून हि पाऊस थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. या बरोबर वन्य प्राणी ही पिकांचे नुकसान करत आहेत. म्हणून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली सर्व पक्षीय तालुका अध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला केली आहे.