
फलटण (अशोक भोसले यांजकडून) : आधीच नापिकी व त्यात निसर्गाचा लहरीपणा अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्यांचे हिरवे स्वप्न जंगली वन्य प्राण्यांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या वेळोशी येथील अनेक शेतकर्यांनी दि 27 रोजी फलटण येथील वनक्षेत्रपाल कार्यालयात वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे अर्ज उप वनसंरक्षक कार्यालयात सादर केले. यावेळी उपस्थित अधिकार्यांनी पुण्याचे साहेब येणार आहेत ते गेल्यावर पंचनाम्याचे बघू असे उत्तर दिल्याने शेतकर्यांच्यात संतापात भर पडली.
फलटण तालुक्यातील पश्चिम भागातील वेळोशी व त्या आसपासच्या शेती शिवारात मागील अनेक दिवसापासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. या वन्यप्राण्यांमुळे शेतातील बाजरी, घेवडा, मूग, कांदा, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसाच्या जीवावर शेत जमिनीत पिक येत असताना या परिसरातील शेतकर्यांनी सध्या बाजरी, घेवडा, मूग, कांदा, मका या पिकांची लागवड करून हातातोंडाशी आलेली पिकं रानडुक्करांनी उध्वस्त केली आहेत. अनेक वेळा वनविभागाच्या अधिकार्यांना तोंडी सांगूनही ते वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीच कारवाई करत नसल्याने या वन्यप्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रत्यक्ष पंचनामा करावा या मागणीसाठी अनेक शेतकर्यांनी सातबारा, फोटो सह अर्ज सादर केले. अनेक शेतकर्यांनी पुर्वानुभव पहाता भरपाईसाठी अर्ज दाखल करणे टाळले.
शेतात काबाड-कष्ट करत लाख मोलाच बियाण खरेदी करून बियाणाची उगवणीपासून ते पिकांची वाढ होईपर्यंत बळीराजाला मोठी काळजी घ्यावी लागते. शेतात मोर, रानडुकर यासारखे वन्यप्राणी पिकात घुसून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. एका अंदाजाप्रमाणे त्यामुळे पिकांचं 40 ते 50 टक्के नुकसान होत, परिणामी उत्पादन घटून मोठा आर्थिक फटका देखील शेतकर्याला सहन करावा लागतो. यामुळे शेतकरी हैराण होतात. असाच फटका आणि उत्पन्नतील घट अनुभवणार्या फलटण तालुक्यातल्या वेळोशी गावच्या लोकांना वनविभागाच्या अजब कारभार फटका बसत आहे.
पिकांची नुकसान भरपाई व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त यासाठी अर्ज दाखल करण्यास येणार्या शेतकर्यांना वनक्षेत्रपाल कार्यालयात उपस्थित अधिकार्यांनी पुण्याचे साहेब दोन दिवसात येणार आहेत, चार दिवस फार काम आहे शनिवारी पंचनाम्यास येतो असे अजब उत्तर दिले. शेतकर्यांच्या पिकांच्या पंचनाम्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्याची सेवा महत्वाची आहे का? असा सवाल करत आगोदरच पिकांचे झालेले नुकसान पहाता राहिलेले पिंक वाचवण्यासाठी धरपडणार्या शेतकर्यांनी वनविभागाच्या दुर्लक्षितपणाकडे पाहत हताशपणे घरचा रस्ता धरला. या नुकसान भरपाईच्या पंचनामा व वन्यप्राण्याचा बंदोबस्ताबाबत वनविभाग काय निर्णय घेते याकडे सर्व नुकसान ग्रस्त शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.