सातारा : गणरायाच्या आगमनाचे वेध लागले असताना सातार्यात गणेश विसर्जनाचा तिढा अधिक जटील झाला आहे. म्हणून नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बोलावलेल्या तातडीच्या विशेष सभेत एकमताने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता पालिका प्रशासन सक्रीय झाले असून विसर्जनाच्या मुद्दयावर उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत.
पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विसर्जनाच्या प्रश्नावर उच्चा न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत विस्तृत ठराव मांडण्यात आला.
गणेश विसर्जनाबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी 2005 साली उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर ऐतिहासिक तळ्याच्या संवर्धनासाठी सातार्यातील सुशांत मोरे यांनी याचिका दाखल केली. त्यावेळी सातारा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्यांनी प्रतिज्ञापत्र दिले. मंगळवार, मोती आणि फुटक्या तलावातविसर्जन बंद करण्यात आल्याचे अभिजित बापट यांनी म्हटले आहे. त्यामुळे तिथे पुन्हा विसर्जन सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास पर्यायी व्यवस्था नसल्याने न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करत मज्जाव असलेल्या तळ्यांमध्ये विसर्जनाला मुभा घ्यावी लागणार आहे. ही सूचना वाचून झाल्यानंतर दत्तात्रय बनकर यांनी विस्तृत मत मांडताना न्यायालयाने कोणत्याच तळ्यात विसर्जनाला बंदी घातली नसून जिल्हाधिकारी चुकीच्या पद्धतीने या प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असून हे जिल्हाधिकार्यांचे कायदेशीर अज्ञान असल्याचे म्हटले. तदनंतर भाजपाच्या विजय काटवटे यांनी उपसूचना मांडली. त्यामुळे काही काळासाठी गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, सर्वांचे अभिनंदन करत असून मदेर से आये मगर दुरुस्त आयेफ असा डायलॉग काटवटे यांनी मारल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. विरोधीपक्ष नेते अशोक मोने यांनी लोकांचे हित लक्षात घेत सत्ताधारी गटाने विरोधकांना सोबत घेत मांडलेल्या ठरावाचे स्वागत केले. अखेर नगराध्यक्षांनी या संवेदनशील प्रश्नावर सर्व सदस्य एकत्र आल्याने समाधान व्यक्त करत असेच सोबत राहून विकासाभिमुख काम करण्याचे आवाहन केले.
पडद्यामागच्या किंगमेकर…
लोकहीत लक्षात घेत पालिकेतील कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या बाळासाहेब बाबर यांनी कृत्रिम तळ्याला विरोध दर्शवताना प्रशासकीय अडचणी मांडल्या होत्या. त्यांच्याच सल्ल्याने सभा आणि ठराव पारित झाले.
मनोमिलनाच्या काळात कृत्रिम तळ्याचा घाट घातला असला तरी गेल्या दोन वर्षात स्वीकृत सदस्य दत्तात्रय बनकर कधी बोलले नाहीत. मात्र, आज त्यांच्यातील पेशाने वकील आणि नागरिक उफाळून बाहेर आल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात रंगल्या होत्या.
देवाच्या कामात धंदा जोमात..!
पालिकेने उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव केला असला तरी खर्चाची तरतूद केली नसल्याने आता सूचनेत नमूद नसले तरी ठराव बदलण्याचा घाट घातला गेला आहे. मात्र, नगराध्यक्षा सौ. कदम परगावी असल्याने रात्री उशिरापर्यंत बदलण्यात आला नव्हता. त्यामुळे देवाच्या कामातही खर्चाचा उद्योग आहेच.