सातारा : सातारा शहराच्या मंगळवार पेठेतील ऐतिहासिक डफळे हौदाची चक्क चोरी झाल्याचा धक्कादायक खुलासा नगरसेवक वसंत लेवे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्क यांनी संबधित विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पालिका सदस्य अवाक झाले. प्रज्वल भारतच्या सातारा शहरातील बंद दिव्यांचा पंचनामा विरोधी पक्षाने मांडला. तर सातार्यात वाढलेली भटकी कुत्री व संसर्गजन्य साथी या विषयावर आरोग्य विभाग झोपा काढतो काय? असा जळजळीत सवाल भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी केल्याने सभागृहातील वातावरण तप्त झाले.
नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सातार्यात एलईडी पथदिवे बसवणेकरिता ईईएसएल बरोबर करारनामा करणे व प्रभाग क्रं 20 मध्ये कारंजाचे सुशोभिकरण करणे या दोन विषयांना मंजूरी देण्यात आली. तत्पूर्वी दीड तास झालेल्या सभेत अनेक धक्कादायक खुलासे झाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मंगळवार तळे श्री विसर्जनासाठी खुले झाले. याविषयावर सभागृहाने जी एकवाक्यता दाखवली त्याचे अशोक मोने यांनी कौतुक केले. छत्रपती शिवाजी सभागृहाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असे करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. नगरसेविका आशा पंडित यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.
प्रज्वल भारतचे भूत पालिकेच्या उरावर
सातार्यातील एलईडी दिव्यांची ठेकेदार कंपनी प्रज्वल भारत याचा पंचनामा नगरसेवक वसंत लेवे यांनी केला. आपण दोघे भाऊ आणि मिळून खाऊ. ज्यांनी प्रज्वल भारत चे भूत पालिकेच्या मानगुटीवर बसवले ते सभागृहात नाहीत. मात्र सातारा शहराचा दोन तृतीयांश भाग अंधारात असताना प्रज्वलची बिले कशी निघतात? असा सवाल लेवे यांनी केला. सहा हजार दिव्यापैकी केवळ चोवीसशे दिवे बसवले गेले व पाचशे दिवे बंद आहेत. विद्युत विभागाने याचा काय पाठपुरावा केला? ज्या टिपण्या आहेत त्यावर तारखा टाकलेल्या नाहीत. असा जाब लेवे यांनी विचारला. नगर विकास आघाडीने सुध्दा केंद्र सरकारची ईई एसएल कंपनीचे दर परवडणारे नाही त्यामुळे स्थानिक कंपनीशी करार करावा अशी आश्चर्यकारक उपसूचना केली. अॅड. दत्ता बनकर यांनी ही कंपनी दिल्लीची आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही कंपनी बिल देण्यास टाळाटाळ केल्यास अनुदानातून कपात करून ते वळते करते असे सांगितले व प्रज्वल भारत ठेकेदार कंपनीचा आग्रह धरला. मात्र केंद्र शासनाच्या अटींमुळे ईई एसएल कराराचा विषय मान्य करण्यात आला.
आरोग्य विभाग रडारवर
सातारा शहरात स्वाईन फ्लू ने तिघांचा मृत्यू झाला. शहरात गणपतीचे आगमन दोन दिवसावर आलेले असताना आरोग्य विभाग धूर फवारणी करत नाही. सातारा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मग आरोग्य विभाग करतोय काय? असा सवाल सिद्दी पवार यांनी करत कायगुडे यांना धारेवर धरले.
– मंगळवार पेठेतील डफळे हौद चोरीला
– मंगळवार पेठ येथील प्रभाग क्रमांक 20 (अ) सि.स. न. 700 येथील डफळे हौद कसा गायब झाला? असा सवाल वसंत ल वे यांनी प्रशासनाला केला. सिध्दी पवार यांनी सुध्दा डफळे हौद चोरीला गेल्या चा टोला लगावला. रेकॉर्ड ला हौदासाठी पालिकेची नोंद असताना तो कसा पाडण्यात आला? लेवे यांच्या प्रश्नावर हौदाच्या जागी बिल्डिंग बांधणार्या संबधित विकसकावर व दोषी कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुहास राजेशिर्के यांनी केली.