Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीनिर्विघ्न विसर्जन मंगळवार तळे का कृत्रिम तळ्यात ? सातारकरांमध्ये संभ्रम ; कृत्रिम...

निर्विघ्न विसर्जन मंगळवार तळे का कृत्रिम तळ्यात ? सातारकरांमध्ये संभ्रम ; कृत्रिम तळे कायमस्वरूपी राहणार का ?

सातारा : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवार पेठेतील कृत्रिम तळ्याचे काम पूर्ण झाले असून पालिकेचे अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून कृत्रिम तळ्याच्या ठिकाणावर तळ ठोकून आहेत. मात्र, साविआचे नेते खा. छ. उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम अथवा त्यांच्या गटाचे इतर सदस्यांनी कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने सातार्‍यातील गणपतींचे विसर्जन मंगळवार का कृत्रिम तळ्यात होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेतच तोडगा निघाला नाही तर ऐनवेळी प्रशासनाची डोकेदुखी वाढणार असून त्यामुळे सातारकरांमध्ये विसर्जनावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
सातार्‍यातील अखेरच्या दिवशीची गणेश मिरवणूक आणि विसर्जन ठिकाण यावरून गदारोळ निर्माण झाला असताना यंदा डॉल्बी वाजणार, असे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी जाहीर केल्याने कधी नव्हे ते शांतता कमिटीच्या माध्यमातून पालिका प्रशासन ते जिल्हाधिकारी आणि आयजी यांनी जनमताचा कानोसा घेतला. याचाच भाग म्हणून प्रतिबंध करण्यात आलेल्या तळ्यांवर पोलिसांनी वेढा दिला असून डॉल्बीचा दणादणाट नको तर पारंपारिक वाद्याचा निनाद बराफ अशी मोहीम राबवत सातारा पोलीस दलाने जनजागृती केली. पालिकेत सत्ता उदयनराजे गटाची असली तरी पालिका प्रशासन कायदा राबवण्यासाठी कटीबद्ध असल्याने कृत्रिम तळ्याव्यतिरिक्त दगडी शाळा (सदरबझार), कल्याणी शाळेजवळ (गोडोली), हुतात्मा स्मारक आणि पोहण्याचा तलाव (राजवाडा) या ठिकाणांवर विसर्जनाची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे.
डीजेवाल्यांचा आवाज पोलिसांनी कारवाई करीत दाबला असला तरी ऐनवेळी कोणतीही सिस्टीम शहरात पोहचणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या तळ्यांवर पोलिसांची करडी नजर असून जर विसर्जनाचा प्रयत्न झाला तर गुन्हे दाखल होणार, हे स्पष्ट झाले आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी गोरे यांनी शहरातील सर्व विसर्जन ठिकाणांवर पालिका कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असल्याने सत्ताधारी सोबत नसले तरी पालिका प्रशासन सज्ज असल्याचे संकेत गोरे यांनी कृतीतून दिले आहेत. विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यासाठी दोन दिवस राहिले असताना सातारकरांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होत नसल्याने चिंतेचे ढग मात्र कायम आहेत. अशा परिस्थितीत ऐनवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असा सूर लोकांमधून आवळला जात आहे.
कृत्रिम तळे कायमस्वरूपी राहणार?
कृत्रिम तळ्यासह चार ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी पालिकेने केली असली तरी पालिकेच्या माथी खर्चाचा बोजा पडू नये, अशी सातारकरांची धारणा आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी कृत्रिम तळे खोदले ती जागा पालिकेला हस्तांतरित करून हेच तळे कायमस्वरूपी विसर्जनासाठी वापरण्यात यावे, अशी मागणी लोकांमधून जोर धरत असून त्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना विविध संघटना साकडे घालणार असल्याच्या चर्चा जोमात आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular