मराठा आरक्षण हे शालिनीताई पाटील यांच्या त्यागाचे फळ
आरक्षणाला विरोध करु नका : खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांची साद
कोरेगाव : मराठा समाजाने आजवर खूप भोगले आहे. मराठा समाजाला कधीही समाजाच्या मुख्य प्रवाहात राहता आले नाही, आजवर सरकारने 16 आरक्षण देऊ केले आहे, ते देखील कोणाचेही आरक्षण न काढता. मग या आरक्षणाला विरोध करु नका, अशी साद खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी घातली. डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची घेतलेली भूमिका आणि त्यासाठी त्यांना करावा लागलेला त्याग, हीच मराठा आरक्षणाची फलश्रुती आहे, असे प्रतिपादन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारारोड येथे सत्यशोधक ज्योत्याजीराव फाळके-पाटील विकास ट्रस्ट, ग्रामस्थ मंडळ व विविध संस्थांच्यावतीने डॉ. शालिनीताई पाटील यांचा नागरी सत्कार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, सांगलीच्या लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा मंदाताई शिंदे-नरवाडकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, सदस्य संदीप शिंदे, सुनील काटकर, सुनील खत्री, शिवाजीराव महाडिक, अॅड. वसंतराव फाळके, नगरसेविका सविता फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी खा. भोसले बोलत होते.
व्ही. पी. सिंग यांच्या नेत्तृत्वाखालील केंद्र सरकारने मंडल आयोग आणून समाजात तेढ निर्माण केली. खर्या अर्थाने समाजात आणि जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम त्यावेळेस सुरु झाले. मंडल आयोगाने केलेल्या शिफारशींचा नीटसा उलगडा न केल्याने मराठा समाजावर अन्याय झाला. डॉ. शालिनीताई पाटील यांनी स्वतःच्या राजकारणाकडे न पाहता, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी लढा उभारला. प्रकृती न बघता, त्यांनी राज्य पालथे घालून आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा प्रकाशझोतात आणला, त्यांचे कार्य हे मराठा समाज कधीही विसरु शकत नाही. माथाडी कामगारांचे नेते आण्णासाहेब पाटील यांच्या बरोबरीने त्यांनी लढा उभारला असल्याचे खा. भोसले यांनी स्पष्ट केले.
अत्यंत त्यागातून आणि कष्टपूर्वक वाटचाल डॉ. शालिनीताई पाटील यांची राहिली आहे. त्यांनी नेहमी समाजाचा विकास हेच धोरण ठेवले. कधीही राजकारण त्यामध्ये आणले नाही. महाराष्ट्राच्या महसूल मंत्री असताना त्यांनी आमच्या राजघराण्यावर होत असलेल्या अन्यायाला विरोध केला. कॅबिनेटच्या बैठकीत त्यांनी सर्वच मंत्र्यांचा समाचार घेतला आणि आमच्या राजघराण्याला न्याय दिला, त्यांचे अनंत उपकार आम्ही कधीच विसरु शकत नाही. त्यांचा नागरी सत्कारासाठी निमंत्रित केल्यावर मी म्हणालो, मी येतोच, पण मी त्यांच्या मुलासारखा आहे, एवढ्या मोठ्या नेतृत्वाचा माझ्या हस्ते सत्कार करण्यापेक्षा मोठी विभुती पहा, मोठे नेतृत्व पहा, मात्र संयोजकांनी मलाच सत्कार करण्यास सांगितले, त्यामुळे मी आज घरच्या कार्यक्रमाला आलो आहे.
खा. भोसले यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. जरंडेश्वर कारखान्याच्या मुद्याबाबत त्यांनी शेतकरी आणि जनतेला आता पुढाकार घेण्यास सांगितले. लोकशाहीमध्ये जनता हीच राजा आहे, त्यांनी मताचा अधिकार अधिक विचारपूर्वक वापरला पाहिजे, एकदा चूक झाली की, पाच वर्षे थांबावे लागते, पाच वर्षे काय थोडीथोडकी नाहीत, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
ना. नरेंद्र पाटील यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेल्या त्यागाबद्दल धन्यवाद दिले. आण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या सामान्य माथाडी कामगाराला ताईंनी आपल्या सत्तेच्या काळात खूप सहकार्य केले, म्हणूनच आज मराठा माणूस मुंबईत हाने राहत आहे. ताईंनी खूप यातना सोसल्या, त्यांचा आणि माझा परिचय छावा संघटनेच्या औरंगाबादमधील मेळाव्यामध्ये झाला. त्यांनी आजवर मराठा समाजासाठी उपस्थित केलेले मुद्दे योग्य व न्याय आहेत. त्यांनी 80 च्या दशकापासून मराठा समाजासाठी सतत नवनवीन उपक्रम हाती घेण्यासाठी सरकारवर दबाब आणला, मात्र सरकार चालविणारे मराठे असले तरी त्यांनी मराठा समाजासाठी वेगळे काही केले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप अभ्यासपूर्वक मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यांनी कसलीही घाई केली नाही. केवळ आरक्षण देऊन ते थांबले नाहीत, तर नोकरीमध्ये लगेच आरक्षण लागू केले आहे. इतर समाजाला आरक्षण देत असताना मराठा समाजाने कधीही विरोधी भूमिका घेतली नाही, आज मात्र मराठा आरक्षणाला विरोध केला जात आहे, ते योग्य नव्हे. मराठा समाजाला आरक्षण हे पहिल्यांदा मिळाले असल्याने त्याबाबतच्या कागदपत्रांची माहिती समाजाला नाही, याबाबत समाजाने आता पुढाकार घेतला पाहिजे. कागदपत्रांची माहिती करुन घेणे गरजेचे आहे.
केवळ नोकरीत समाधान न मानता मराठा समाजाने उद्योग व्यवसायात यावे, स्वतःच उद्योग उभे करुन इतरांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. केवळ राजकीय नेत्यांच्या मागे फिरुन, आपण यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी आम्ही तालुका आणि जिल्हास्तरावर मेळावे घेत असून, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शालिनीताई पाटील यांनी आपल्या नेहमीच्याच आक्रमक शैलीत अनेकविध मुद्दे उपस्थित केले. सांगलीतून सातारा जिल्ह्याकडे झालेला राजकीय प्रवास त्यांनी उलगडून दाखविला. शेतकर्यांच्या हितासाठी साखर कारखाना उभारला, मात्र तो हिसकावून घेतला. चोर, दरोडेखोर आणि लुटारुंनी कारखाना हडप केला. या प्रवृत्तींना हद्दपार नव्हे तर ठेचून काढले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्यात कोर्टकचेर्या मला नव्या नाहीत, जे काही मी मिळवले आहे, ते कोर्टातून मिळवले आहे. त्यामुळे कारखाना देखील मी न्यायालयातून ताब्यात घेईनच, मात्र छत्रपती म्हणून खा. उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जरंडेश्वर कारखाना शेतकर्याच्या मालकीचा करावा, राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खधीकरण केले जात असून, त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.अॅड. वसंतराव फाळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अॅड. जयवंतराव केंजळे, अॅड. विजयराव कणसे यांची भाषणे झाली. मंदाताई शिंदे-नरवाडकर यांच्या कार्याचा जागतिकस्तरावर करण्यात आलेल्या गौरवाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. शालिनीताई पाटील व श्रीमती मंदाताई शिंदे-नरवाडकर यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. रवि साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कॅप्शन-सातारारोड येथे विविध संस्थांच्यावतीने डॉ. शालिनीताई पाटील यांचा नागरी सत्कार करताना खा.श्री.छ.उदयनराजे भोसले उपस्थित ना. नरेंद्र पाटील, मंदाताई शिंदे-नरवाडकर व इतर
मराठा आरक्षण हे शालिनीताई पाटील यांच्या त्यागाचे फळ
RELATED ARTICLES