महाबळेश्वर : गौणखनिज वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवुन गौण खनिजाचे वाहतुक करणारे पाच ट्रक मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास येथील तहसिलदार मिनल कळसकर यांनी सापळा लावुन पकडले. शिवाय त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी या पाच ट्रक मालकांना 5 लाख 65 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. या एका महिला तहसिलदार यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.
दि. 8 जानेवारी 2019 रोजी महाबळेश्वरच्या तहसिलदार या वाई येथे शासकिय बैठकीसाठी गेल्या होत्या तेथुन रात्री परत येत असताना त्यांना खबर मिळाली की, चिपळुन येथुन नऊ ट्रक दगड भरून महाबळेश्वर मार्गे पुढे जाणार आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे एक लिपिक व एक शिपाई असे दोन कर्मचारी बोलावुन घेतले व मध्यरात्री 12 वाजता महाड नाका येथे पोलिसांच्या मदतीने सापळा लावला. 1.30 वाजण्याच्या सुमारास एका मागुन एक ट्रक येवु लागले. अर्ध्या एक तासात पाच ट्रक आले तसे ते पकडण्यात आले. पाच ट्रक पकडण्यात आल्याची खबर घाटात असलेल्या चार ट्रक चालकांना मिळाली. त्यांनी ते ट्रक घाटात असलेल्या एका ढाब्यावर थांबविले व तेथेच थांबणे पसंत केले त्यामुळे 9 पैकी पाच ट्रक सापळ्यात अलगद सापडले त्यांना तहसिल कार्यालया बाहेर उभे करण्यात आले व तातडीने पुढील कारवाई करण्यात आली.
गौण खनिज याची वाहतुक सुर्योदय ते सुर्यास्त याच वेळेत करायची असते याबाबत कठोर नियमावली आहे. परंतु महसुल विभागाचे प्रशासन गृहीत धरून नियम डावलुन गौण खनिजाची वाहतुक केली जाते. याबाबत महाबळेश्वर तहसिलदार मिनल कळसकर यांना माहिती मिळताच त्यांनी मोजक्या कर्मचारी यांचे मदतीने पाच ट्क पकडुन धाडसी करवाई करून 5 लाख 65 हजार रूपये दंड ठोठावला. यामध्ये विलास मोरे, योगेश साळुंखे, गणेश भिलारे यांना 1 लाख 10 हजार 800 रूपये तर विजय कासुर्डे यांचे दोन ट्रक व आरीफ शारवान यांचा एक असे प्रत्येकी 1 लाख 16 हजार 200 असा दंंड करण्यात आला आहे ही सवर्र् दंडाची रक्कम 5 लाख 65 हजार रूपये होते.
रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेवुन आजही वाळु वाहतुक होत असते तर दगड या गौण खनिजाची वाहतुकी मोठ्या प्रमाणावर येथे होत असते मात्र महाबळेश्वरच्या तहसिलदार पदाची सुत्रे हाती घेतल्या नंतर मिनल कळसकर यांनी अशा प्रकारे होणारी विना परवाना व नियम धाब्यावर बसवुन केली जाणारी वाहतुक यावर लक्ष केंद्रित केले असून आज पर्यंत त्यांनी 12 ट्रक पकडुन लाखो रूपये दंड आकारून शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारे वाहतुक करणारांचे कंबरडेच मोडले असून या पुढील काळात अशा प्रकारे चोरटी वाहतुकीला आळा बसेल अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
नियम धाब्यावर बसून वाहतूक पाच ट्रकवर कारवाई
RELATED ARTICLES