औंध :औंध येथील कुस्ती मैदान आटोपून मागील बारा जानेवारी रोजी क्रांती कुस्ती क्रिडा संकुल कुंडल येथे निघालेल्या पाच कुस्ती मल्लांवर काळाने घाला घातला व वांगीजवळ झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मूत्यू झाला .ऐन उमेदीतील मल्लांचा झालेला मूत्यु त्यांच्या कुटुंबियांच्या मनाला चटका लावून गेला असून अजूनही याघटनेवर कुणाचाच विश्वास बसत नसून घडले हे सत्य आहे. पाच मल्लांच्या दुर्देवी मूत्युबद्दलच्या आठवणींनी औंधकरवासियांसह अनेक दिग्गज मल्ल, कुटुंबिय व्याकूळ झाले आहेत. दरम्यान आपला मुलगा मोठा पैलवान होईल ,घराण्याचे नाव काढेल यासाठी यातील अनेक कुटुंबियांच्या सदस्यांनी सर्वस्व पणाला लावून मुलांच्या कुस्तीसाठी जीवाचे रान केले ,दिवसरात्र कष्ट करुन ही कोवळी पोरे शिकण्यासाठी कुंडल येथे ठेवली होती पण नियतीने एका क्षणात होत्याचे नव्हते केले.
पै.अविनाश गायकवाड फुफिरे(शिराळा),पै.विजय शिंदे(रामापूर),पै.शुभम घार्गे(सोहोली),पै.सौरभ माने मालखेड(कराड),पै.आकाश देसाई(काले),रणजित धनवडे दुधोंडी (ड्रायव्हर) या सहा जणांचा बारा जानेवारी रोजी रात्री दुर्देवी मूत्यु झाला. यामधील पाच मल्ल हे ऐन वीस ते पंचवीस वयोगटातील होते. अविनाश हा शेतकरी कुटुंबातील होता.
त्याने दोन वेळा विद्यापीठ स्पर्धेत राष्ट्रीय पारितोषिक मिळविले होते. तो कुटुंबाचा एकुलता आधार होता तर रामापूरच्या विजय शिंदे याने कुटुंबाचा वारसा पुढे चालविण्यासाठी याक्षेत्रात उडी घेतली .अपघातस्थळापासून अवघ्या एक किमी अंतरावर झालेले त्याचे निधन सर्वांनाच हुरहूर लावून गेले. मी येतोय तू न्यायला ये हा त्याने भावाला केलेला फोन हा शेवटचाच ठरेल असे कुणालाच वाटले नाही इतक्या या अपघाताच्या वेदना अतिशय तीव्र व कष्टप्रद आहेत. पै.शुभम घार्गे याचे गाव सोहोली.अतिशय गरीब कुटुंबातील या मल्लाने आपल्या कुस्ती कौशल्याने अनेकांच्या मनावर गारुड घातले होते. तीस ते नव्वद किलो वजन गटातील त्याचा प्रवास थक्क करणारा होता. पण तो घरी मुक्कामी न जाता कुंडलकडे जात असताना काळाने अनपेक्षितपणे घाला घातला. कालेच्या पै.आकाश देसाईच्या आईवडीलांनी बाजार करून भाजीपाला विकून आपला मुलगा मोठा मल्ल बनविण्याचा चंग बांधला होता .त्यासाठी दिवसरात्र कष्ट उपसण्याची तयारी ठेवली होती पण नियतीने हे सर्व उधळून लावले असून अजूनही या वेदना, जखमा मनाला चटका देत आहेत. पै.सोरभ माने हा मालखेडचा होता.
त्याचे वडील रिक्षा चालवून सौरभला मोठे करण्याचे स्वप्न पहात होते. कोणत्याही प्रकारचा खुराक कमी पडू नये म्हणून ते अथक परिश्रम करीत होते. त्याने अल्पावधीतच अनेक ठिकाणी नेत्रदीपक कुस्त्या केल्या होत्या तसेच घवघवीत यश,पारितोषिके मिळविली होती.
. पण काळाच्या उदरात होत्याचे नव्हते झाले व ऐन उमेदीतील मल्ल अपघातात ठार झाले. त्यांच्या या आकस्मिक एक्झिटमुळे सातारा,सांगली जिल्ह्यातील कुस्ती शौकीन, मल्ल, त्यांचे कुटुंबीय दु:खी असून शनिवारी या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी ही अजूनही यावर कोणाचाच विश्वास बसेना.
औंध येथील कुस्ती मैदान आटोपून ,जेवण करून परत फिरणार्या या पाखरांसाठी तो त्यांच्या जीवनाचा शेवटचाच प्रवास ठरला.
कुंडल कुस्ती केंद्रातील मल्लांच्या दुर्दैवी अपघाताची वर्षपूर्ती
RELATED ARTICLES