सातारा, : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 417 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत 233 कोटी 63 लक्ष 6 हजार 928 रुपये प्राप्त झाले असून यापैकी 181 कोटी 29 लक्ष रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.
राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची सातारा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असून दि. ११ डिसेंबर पर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी १८१ कोटी २९ लक्ष रुपये रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे २६ हजार २६४ शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले आहे. तसेच ३९३३८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषी व्यवस्थेला बळ पुरवणारी ठरली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. योजनेच्या गतिमान व अचूक कार्यवाहीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची कार्यवाही वेगाने सुरु असून या योजनेंतर्गत आतापर्यंत २३३ कोटी ६३लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी २६२६४ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ११९ कोटी ४५ लक्ष ४५९१ रुपये रक्कम जमा करण्यात आली असून ३९३३८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६१ कोटी ८४ लक्ष २६ हजार ८७२ इतकी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुध्दा बँकांच्या माध्यमातून गतीने सुरु आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५९३०८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २१० कोटी २२ लक्ष ४७ हजार २७५ आणि राष्ट्रीय कृत व व्यापारी बँकांना ३ हजार ५६५ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २३ कोटी ४० लक्ष ५९ हजार ६५३ रुपये असे एकूण २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६२ हजार ३७ शेतकरी खातेधारकांच्या खात्यात १५७ कोटी ८८ लक्ष रुपये, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेच्या ३ हजार ५६५ शेतकऱ्यांच्या खात्यात २३ कोटी ४० लक्ष रुपये अशी एकूण १८१ कोटी २९ लक्ष ३१ हजार ४६४ रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. कर्जमाफीसाठी टप्प्या-टप्प्याने ग्रीन लिस्ट व कर्जमाफीची रक्कम प्राप्त होत आहे. आतापर्यंत एकूण तीन ग्रीन लिस्ट नुसार कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सांगितले.
कर्जमाफीसाठी आतापर्यंत जिल्ह्याला २३३ कोटी ६३ लक्ष रुपये प्राप्त ; १८१ कोटी २९ लक्ष रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
RELATED ARTICLES