सातारा दि. 15 (जि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘युवा माहिती दूत’ नाविण्यपूर्ण असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे शासनाच्या सर्व योजना समाजापासून वंचित असणाऱ्या घटकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ‘युवा माहिती दूत’ महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभागआणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी युवा माहिती दूत या उपक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे आदी उपस्थित होते.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साहीतरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्यशासनाकरिता तळागाळाच्या पातळीवर काम करण्याची महत्वाची संधी युवकांना मिळणार आहे. युवा माहिती दूत’ अशी ओळख राज्यशासनाच्यावतीने त्यांना देण्यात येणार आहे. ठरवून दिलेले काम केल्यानंतर त्यांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात देण्यात येणार आहे. शासनाच्या युवा माहिती दूत उपक्रमात जास्ती जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी शेवटी केले.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी यासाठी महाविद्यालयीन यवुकांच्या सहभागाने युवा माहिती दूत ही योजना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सुरु करत आहे. नव्या युगाचा मंत्र घेवून वाटचाल करणाऱ्या युवकांसाठी समाजाभिमुख काम करण्याची ही संधी असून यात अधिकाधिक महाविद्यालयीन युवक सहभागी होतील अशी अपेक्षा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केली.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालयीन युवक-युवती, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यात युवा माहिती दूत महत्वाची भूमिका बजावतील :- पालकमंत्री विजय शिवतारे
RELATED ARTICLES