Friday, April 25, 2025
HomeUncategorizedमहामानवाचा वारसा जतन करुया :- अरुण जावळे

महामानवाचा वारसा जतन करुया :- अरुण जावळे

 

सातारा दि. (प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॕनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना ‘समतेचे जागतिक प्रतिक’ असा बहुमान घोषित करुन डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा समतादिन म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केलाय. ही गोष्ट भारतासाठी गौरवपूर्ण असून आज डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा साता-याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरतंन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.

ज्या शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला त्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने होते.

साहित्यिक अरुण जावळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला घेऊन जायला हवे. त्यांचा संघर्ष, त्यांचा शैक्षणिक प्रवास हा विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि प्रेरणा बनायला हवा, तरच डॉ. आंबेडकराच्या स्वप्नातील विद्यार्थी घडू शकतील आणि मग राष्ट्रही आपोआप घडू शकेल. त्यामुळे मजबूत विद्यार्थी घडविण्याचं कार्य आपण सुरू ठेवुयात. आंबेडकरांचा विचारवारसा जर आपल्या जपायचा असेल, हे राष्ट्र सक्षम – समृध्द बनवायचे असेल तर नव्या पिढीकडे अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने आपण पहायला हवे. कारण नवी पिढी हीच उद्याचा नवा भारत असणार आहे.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सन्मती देशमाने म्हणाले ज्या हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले ते हायस्कूल चालविण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. या हायस्कूलला लाभलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा निश्चितपणे अधिक सक्षमपणे जपण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे हायस्कूल कसे पोहचेल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा प्रयत्न यशस्वी करणं हीच एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे समन्वयक राजेंद्र कांबळे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदानावर भाष्य केले. छ. प्रतापसिह हायसूकूमधील शिक्षक महेंद्र एकळ यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले तर आभार महेश घाडगे यांनी मानले. यावेळी पूनम महाजन, सतीश गोफणे, उत्तम साळुंखे, अर्चना पंडत, विशाल अडसूळ आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular