Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून सुशिक्षितांना हप्तेवसुलीचे प्रशिक्षण

सातार्‍यात फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून सुशिक्षितांना हप्तेवसुलीचे प्रशिक्षण

सातारा : सध्या वाढत्या बेरोजगारीमुळे बेकारांचे प्रमाण वाढले आहे. यावर आरक्षणाचे गाजर दाखवले जात असले तरी सध्या नोकर्‍या मिळू शकत नाहीत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मिळेल ते काम करण्यास तयार होतात. त्याचा फायदा आता फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून सुशिक्षितांना हप्तेवसुलीचे प्रशिक्षण दिले जात आहे. दररोज सकाळी पन्नास ते साठ कर्जदारांना हप्तेवसुलीसाठी काही फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली हे सुशिक्षित बेकार धमक्यासुद्धा देवू लागले आहेत. याबाबत आता जिल्हा पोलीस प्रमुखांनीच लक्ष घालून अशा फायनान्स कंपन्यांच्या हप्तेवसुलीवर आळा घालावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
सातारा शहर हे पेन्शनरांचे शहर आहे. या शहर परिसरात नोकरी व्यवसायानिमित्त अनेकजण स्थायिक झाले आहेत. काहींनी खाजगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज काढून वाहन, घर व छोटे मोठे व्यवसाय ते अगदी मोबाईलपर्यंतसाठी कर्ज उचलले आहे. या कर्जाचे हप्ते प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला वसूल केले जात असले तरी पहाटे चार वाजताच फायनान्स कंपनीच्या खात्यात रक्कम जमा असणे आवश्यक आहे. अन्यथा, हप्ता थकला व धनादेश वठला नाही म्हणून 500 रुपये दंड आकारणी केली जाते. यासाठी बेकायदेशीररित्या कर्जदाराकडून आगावू धनादेश घेतले जातात. तसेच त्याच्याकडून करारनाम्यावर पंचवीस सह्या घेतल्या जातात. हे करारनामे फायनान्स कंपन्या स्वत:कडेच ठेवतात. त्याआधारेच आता हप्तेवसुलीसाठी सर्वसामान्य सातारकरांवर मानसिक दडपण आणले जात आहे. या फायनान्स कंपन्यांच्या नावाने हप्ता वसुलीचे काम बड्या ठेकेदारांकडून केले जाते. हे ठेकेदार राजाश्रित असले तरी सुशिक्षित मुलांना तुटपूंजे वेतन व कमिशनवर हप्तावसुलीचे काम दिले जाते. हे सुशिक्षित तरुण संघटित नसल्यामुळे त्यांचा अपघात झाल्यास त्याला कोणीही वाली राहत नाही.
सध्या सातारा जिल्ह्यात सुमारे 500 पतसंस्था तसेच खाजगी फायनान्सच्या 50 शाखा आहेत. यातून दर महिन्याला सुमारे 200 कोटी रुपये कर्जाचे हप्ते त्याचबरोबर दंडात्मक रक्कम वसूल केली जाते. गेल्यावर्षी सात कोटी रुपये अशाप्रकारे दंडात्मक कारवाईतून जमा झाली होती. याची कल्पना अग्रणी बँकेचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेल्या अधिकार्‍यांना देवूनसुद्धा कोणतीच कारवाई केली नाही. उलट, सध्या हप्तावसुलीसाठी सुशिक्षितांना टार्गेट दिले आहे. त्यामुळे आता खाजगी सावकारीपेक्षा या फायनान्स कंपन्यांच्या भाईगिरीला कर्जदार त्रस्त झाले आहेत. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख हे कर्तबगार अधिकारी आहेत. त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांनी गरीब कर्जदारांची व्यथा ऐकून या सुशिक्षित हप्तेवसूल करणार्‍या युवकांची कार्यशाळा घ्यावी. कारण भविष्यात अशा या हप्तेखोरीच्या सवयीमुळे हे सुशिक्षित वाममार्गाला लागले तर फायनान्स कंपन्यांचे नव्हेतर सातारकरांचे नुकसान होणार आहे. कर्ज काढल्यानंतर त्याचे हप्ते भरणे ही कर्जदाराची नैतिक जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडलीच पाहिजे. परंतू काही कारणास्तव एखादा हप्ता थकला म्हणून त्या कर्जदाराला मोबाईलद्वारे वा घरी जावून धमकावणे ही गुंडगिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम द्यावा व योग्य ती कारवाई करावी. कारण फायनान्स कंपन्या अशावेळी हात झटकतील, याचीही यानिमित्ताने अशा हप्ते वसूल करणार्‍या सुशिक्षितांना जाणीव होईल, तेव्हा त्यांना आपला वापर झाल्याचे दिसून येईल अशीही चर्चा रंगू लागली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular