सातारा : निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असली तरी पांचगणी- महाबळेश्वर या परिसरातील भूमिपुत्रांना पोटापाण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी परिसरात नाईलाजाने रोजगारासाठी जावे लागते. जिद्दीच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणारी जनता आता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी व काँगेसलाच संधी देईल असा विश्वास मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांचगणी येथे रविवारी दुपारी कार्यकतें ,व्यापारी व नागरिकांच्या भेटीगाठी घेतांना राष्ट्रवादी व काँग्रेससह मित्रपक्षाचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी हे मनोगत व्यक्त केले.
यावेळी पांचगणीच्या उपनगराध्यक्षा सुलभा लोखंडे , नगरसेवक नारायण बिरामाने , विठ्ठलराव बागडे, उज्वला महाडिक, युवक काँगेस चे जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे, विकास शिंदे, महाबळेश्वर चे माजी सभापती विजय भिलारे नितीन चोरगे, बळासाहेब चोरगे, यांची प्रमुख उपस्थिती होती . ते म्हणाले, थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी महाबळेश्वर वसवले, तसेच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. याशिवाय स्वखर्चाने सातारा ते पुणे रस्त्याचे काम केले. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, त्यामुळे या परिसराचा आणखी विकास व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. पूर्वी कुटुंबे लहान होती मात्र आता कुटूंबांचा विस्तार झाला तरी जागा मात्र तेवढीच राहिल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पर्यावरणविषयक नियम, सरकारच्या जाचक अटी, इको सेन्सटीव्ह झोन, पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ समितीचे नियम, त्यातच व्याघ्रप्रकल्पासह विविध बंधनांमुळे इथल्या भूमीपुत्रांनी जगायचं कसे असा प्रश्न निर्माण होत आहे . इथे पर्यटनवाढ झाली मात्र स्थानिकांना फारश्या सुविधा मिळत नाहीत, म्हणून स्थानिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी कार्यरत आहे . जाचक सरकारी अटीं व नोकरी व्यवसाय नसल्याने तरुणाई वाम मार्गाला वळण्याचा धोका आहे त्यामुळे केवळ सरकारच्या चुकीमुळे उद्याच्या आदर्श पिढीच्या भवितव्याचा र्हास झाल्यास काळ कोणालाही माफ करणार नाही म्हणून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर देश नेण्यापेक्षा विधायक जडणघडणीसाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहावे व राष्ट्रवादी व काँग्रेससह मित्रपक्षाच्या उमेदवारांना मते देऊन देशात सत्ता परिवर्तन घडवा, असे आवाहनही त्यांनी केले . कासच्या धर्तीवर वेण्णा लेकची उंची वाढवून सायफन पद्धतीने पाणी देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले .
नगरसेवक विठ्ठलराव बागडे यांनी यावेळी त्यांच्या भाषणात कार्यकर्त्यांनी गाफील न राहता महाराजांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले .विकास शिंदे म्हणाले की, पांचगणी- महाबळेश्वरसाठी नेमलेल्या विविध उच्चस्तरीय समितीच्या निर्बंधांमुळे स्थानिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते.
मात्र यापुढेही वेळोवेळी महाराजांनी लक्ष घालून येथील व्यापारी, रहिवासी, शेतकरी, विद्यार्थी यांचे विविध प्रश्न सोडवून त्यांना दिलासा दिला आहे. यापुढेही त्यांनी अशीच कृपादृष्टी ठेवावी.
यावेळी व्यापारी असोसिएशन, टेबललँड, मर्चंट्स असोसिएशन, टॅक्सी चालक- मालक संघटना, पांचगणी स्पोर्ट्स क्लब तसेच शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शहर परिसरातील विविध व्यापारी, आजी-माजी नगरसेवक तसेच परिसरातील विविध गावातून आलेल्या सरपंच,उपसरपंच व पदाधिकार्यांनी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रस्ताविक जगन्नाथ शिंदे यांनी केले, नगरसेवक दिलावर बागवान यांनी आभार मानले.
डोंगरदर्यातील जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध : उदयनराजे
RELATED ARTICLES