सातारा दि : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कोरेगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वजनदार उमेदवार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवला व्यक्तिशः जबाबदार असणारे काही मंडळी आता आ शिंदे यांची विधानपरिषदेत वर्णी लागल्यानंतर जवळीक साधत असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
वीस वर्षपूर्वी आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात राजकारणात प्रवेश करताना जावळी मतदारसंघात १९९९ व २००४ त्यानंतर कोरेगाव मतदारसंघात २००९ व २०१४ साली घवघवीत यश संपादन केले होते. त्यांची वाढती लोकप्रियता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची जवळीक पक्षांतर्गत काहींना डोईजड वाटू लागली होती. त्यातूनच मग त्यांना प्रत्येक वेळी राजकीय संघर्ष करावा लागला होता. त्यांच्या जवळ असलेल्या काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षातील नेत्यांकडून खाजगी बैठकीत टोमणे सुध्दा खावी लागली होती. ही बाब विरोधकांनी जाणली आणि सर्व विरोधक व राष्ट्रवादी गद्दार यांची मोट बांधून भाजपचे निष्ठावान पण तिकीट वाटपात शिवसेने कडून अधिकृतपणे तिकीट प्राप्त केलेले आ. महेश शिंदे यांचा ६,२३२ मताधिक्याने विजय झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे यांना ९५,२५५ व वंचित आघाडी,नोटा व इतर अपक्ष यांना ७,९४२ मते मिळाली होती. त्याचा ही फटका कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस निष्ठावानाना बसला आहे हे नाकारून चालणार नाही.
आ. शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघात २०१४ साली ६० टक्के म्हणजे ४७,२४२ व २००९ साली ६२ टक्के म्हणजे ३१,७५३ एवढे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आ शिंदे यांच्या विजयाची खात्री दस्तुर खुद्द जेष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा होती.पण, सेनेचे महेश शिंदे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील प्रमुख गावात,सातारा रोड येथील कामगार संघटनेच्या स्वयंघोषित पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील राजकारण याच्या नाराजीचा फटका बसला होता.साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपवासी झाले असले तरी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी अंतर्गत काहींनी विरोधकांशी मोट बांधली. याला खतपाणी घालण्याचे काम इमानेइतबारे काहींनी बेमालूमपणे केले . याचे कोरेगाव मतदारसंघातील सर्व पक्षीय कार्यकर्ते साक्षीदार आहेत.हे आता लपून राहिले नाही. फक्त आ. शशिकांत शिंदे यांनी ते कायमस्वरूपी लक्षात ठेवावे अशी ही कार्यकर्ते मागणी करू लागले आहेत.
सध्या कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्रातील नऊ विधानपरिषद जागेची बिनविरोध निवड झाली आहे. जेष्ठ नेते पवार साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होऊन सहा महिने जखमी झालेल्या जावळीच्या वाघाला व कोरेगावच्या आमदाराला पुन्हा नवी उमेद दिली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामान्य कार्यकर्ते सुखावले आहेत. सोशल मीडियावर असंख्य राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाचा हिशोब केला जाणार अशी सूचक पोष्ट टाकल्या आहेत. त्याचा ही परिणाम जाणवू लागला आहे.
यशाला सर्व वाटेकरी असतात पण, पराभवाचे वाटेकरी बनण्यास कोणीही तयार होत नाही. हे यातून स्पष्ट होऊ लागले आहे. ज्या माथाडी कामगार संघटनेचे बाळकडू स्वर्गीय आण्णासाहेब पाटील, स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या कडून शिकण्यास मिळाले. त्याच संघटनेच्या माध्यमातून आता माथाडी कामगार व कोरेगाव मतदारसंघातील जनतेला पुन्हा एकदा विकास कामांतून जोडले जाणार आहे. ज्यांनी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात फिरकले नाही किंबहूना ज्यांनी विरोधात काम केले त्यातील काही मंडळींची आ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. हीच तर काळाची महिमा आहे. ””’उगवत्या सूर्याला नमस्कार व मावळत्या सूर्याला निरोप”’ देणाऱ्याची बाजू प्रखरतेने पुढे आली आहे. यालाच राजकारण म्हणतात अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवाला जबाबदार असलेल्या काहींची पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्नाची जोरदार चर्चा
RELATED ARTICLES