सातारा : गेल्या दोन महिन्यापासून राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लावणारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी रणधुमाळी रविवारी मशीनबंद झाली. एकूण 282 जागांसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या 1024 उमेदवारांच्या राजकीय उमेदवारीचा व 52 नगराध्यक्षांचा निर्णय निश्चित झाला. जिल्ह्यात 74.81 टक्के मतदान झाल्याने व चुरशीच्या लढतीमुळे निकाला बाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोमवारी सत्तासोपानाची राजकीय पत्रे निकालाद्वारे खुले होणार असून राष्ट्रवादीने प्रतिष्ठा राखण्यासाठी देव पाण्यात घातले आहे.
सातार्यात गोडोली येथे पोलीस व कार्यकर्ते यांच्यात झालेली चकमक व मल्हारपेठेत दोन गटात मारामारी होऊन सातारा शहर पोलीसांनी 10 जणांना ताब्यात घेतले, या घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेेत पार पडले. या मतदानांचा आढावा घेतला असता नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींमध्ये मतदारांनी भरभरुन मतदान केले. यामध्ये खंडाळा नगरपंचायतीत विक्रमी 91.19 टक्के मतदान झाले. त्यानंतर म्हसवड 83.73, दहिवडी येथे अनुक्रमे 83.4 टक्के मतदानाची नोद झाल्याने धक्कादायक निकालाची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकांमध्ये रहिमतपूर 85.71 व सातारा 67.82 मतदान झाले. कराड 76.52, फलटण 68.22, वाई 75.69, पाचगणी 78.62, महाबळेश्वर 83.73, याप्रमाणे सातारा जिल्ह्यात सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सरासरी 74.81 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. याबरोबरच कोरेगाव नगरपालिकेसाठी 81.67, मेढा 88.07, पाटण 74.36, वडूज 76.66, खंडाळा 91.19, दहिवडी 83.4 टक्के मतदान झाले आहे.
सातार्यात 93 हजार 433 मतदारांपेकी 63 हजार 762 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रहिमतपूर मध्ये सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 83 टक्के त्याखालोखाल म्हसवड मध्ये 75 मतदान झाल्याने मतदार राजाचा कौल काय असणार या विषयी राजकिय तर्कवितर्क सुरु झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 14 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षीय आघाड्या सर्वात प्रभावि ठरल्या असून विधान परिषदनिवडणूकामध्ये गमावलेली पत कमवण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीने मोर्चे बांधणी केली होती. त्यांना कितपत फळ मिळाले याचे उत्तर आज मिळणार आहे.
सातार्यात भाजप, राष्ट्रवादी, कोरेगाव मध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुध्द काँग्रेस, कर्हाड मध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, विलासराव पाटील उंडाळकर, वाईला मकरंद पाटील विरुध्द मदन भोसले, फलटण मध्ये रामराजे विरुध्द रणजितसिंह नाईक निंबाळकर, म्हसवड मध्ये शेखर गोरे विरुध्द जयकुमार गोरे अशी राजकीय टस्सल असल्याने जिल्ह्याच्या राजकीय रणधुमाळीची दिशा संवेदनशील टप्प्यावर पोहचली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतीचे अविश्वास ठरावाचे प्रकरण विधान परिषद निवडणूकीत खासदार गटाने काँग्रेसला जोडीला घेऊन केलेली राष्ट्रवादीची कोंडी सातार्यात तुटलेले मनोमिलन कर्हाडात पृथ्वीराज चव्हाणांची मुत्सद्देगिरी, माण तालुक्यात उघडउघड रंगलेला भाऊबंधकीचा राजकीय दावा यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अग्नीपरीक्षा ठरली आहे. भाजप साठी जिल्ह्याच्या राजकारणासाठी पाय रोवण्याची नामी संधी असून पक्षश्रेष्ठीनीं सातार्याजिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना पुरेपुर ताकद देण्याचा प्रर्यंत्न केला. जिल्ह्यात 1 हजार 76 मतदारांसाठी 3 लाख 32 हजार मतदारापैकी सरासरी 2 लाख 18 हजार मतदारांनी सत्ता सोपानाचा राजकीय कौल दिला. हा कौल कोणाच्या बाजुने झुकणार याचे उत्तर आज त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नियोजित ठिकाणी होणार असुन पोलीस व जिल्हा प्रशासन यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. 284 जागांच्या निकालासाठी एकूण 1500 हजार कर्मचार्यांची नियुक्ती झालेली आहे. सातार्या जिल्हात 42 उपद्रवी केंद्रे असुन त्या केंद्रावर ज्यादा पोलीस बंदोबस्त, व्हिडीओ चित्रिकरणाची सोय करण्यात आली होती.
मारामारीमुळे तणाव
सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदान बंदोबस्त करत असताना शनिवारी मध्यरात्री ढोर गल्ली, मल्हार पेठ परिसरात गटागटाने फिरणार्या आठ जणांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे सपोनि वैरागकर हे मतदान बंदोबस्तच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना ढोर गल्लीत गटागटाने फिरणारे काही इसम दिसले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते औंध, ता. खटाव येथील रहिवाशी असल्याचे सांगितले. तसेच उमेदवार बाळू खंदारे यांचे समर्थक असल्याचे सांगितले. तरीही त्यांचा खुलासा पुरेसा न वाटल्याने सागर राजेंद्र चव्हाण (वय 30), अनिस रफीक शेख (वय 22) विनोद युवराज कदम (वय 26), अक्षय सुधीर थोरात (वय 20), विक्रम भगवंतराव कदम (वय 26), कुलदीप विजय पवार (वय 28), नितीन संजय लावंड (वय 19), समशेर मुबारक खान (वय 26), विशाल कैलास पाटोळे (वय 19) सर्व रा. औंध, ता. खटाव यांना अटक केली. पालिका निवडणूक मतदान दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून नये, मतदान प्रक्रिया पुर्णपणे शांततेत पार पाडावी, यासाठी त्याच्यावर सीआरपीसी 151 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली. येथील रविवार पेठेत नगरविकास आघाडीने पुरस्कृत केलेले उमेदवार योेगेश चोरगे व सातारा विकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत आंबेकर यांच्या समर्थकांमध्ये तोफखाना परिसरात जोरदार वादावादी झाली. तर गोडोलीत सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बुथ केंद्र लावण्यावर पोलीसांनी आक्षेप घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याघटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.