सातारा : बाजार समितीची आठवडा बैल बाजारसाठी आरक्षित असलेल्या जागेची सोयीनुरुप विक्री करुन त्याबदल्यात पडद्याआडून कोटयावधींची माया गोळा करणार्यांचे वारसदार, सहकारी आता खिंडवाडी येथील जागेवर बैलबाजार भरवण्याच्या वल्गना करीत आहेत. आपलं द्यायचं लुटुन आणि दुसर्याचे घ्यायचे लाटुन असा हा प्रकार म्हणजे एक कपटी योजना आहे. यामध्ये शेतकर्यांचे हित नाही तर जमिन लाटायची आहे. खरंच बैलबाजार भरवायचा असेल तर पूर्वी आरक्षित असलेल्या बाजार समितीच्या प्लॉट नं.39 च्या जागेवरच भरवा अन्यथा मला तुमच्या सारख्या होयबा आणि बैलोबांचाच बाजार मांडला जाईल अशी सणसणीत चपराक खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी खिंडवाडी येथे बैलबाजार भरवण्याची घोषणा करणार्यांना लगावली.
खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा शेती उत्पन्न बाजार समितीची एकूण 8 एकर33 गुंठे जागा आहे. या जागेपैकी जनावरांचा आठवडी बाजार भरवण्याकरीता भुसार मार्केटच्या खालील प्लॉट नं.39 मधील ओपन स्पेस जागा आरक्षित आहे. परंतु जनावरांचे प्रमाण कमी आहे, आठवडी बाजार भरत नाही, जागा नुसती पडून आहे इत्यादी तकलादु कारणे दाखवून, बैलबाजारासाठी आरक्षित असलेल्या जागा बाजार समितीचे तत्कालीन सत्ताधारी चेअरमन आणि त्यांच्या टिमने विक्री केली आणि कोटयावधींची माया गोळा केली. सध्याचे चेअरमन अॅड. श्री.विक्रम पवार यांना चेअरमनकीचा वारसा त्यांच्या वडीलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील अॅड.लालासाहेब पवार बरेच वर्षे बाजार समितीचे चेअरमन होते. त्यांच्या नजरेतुन नजरचुकीने सुटलेली बाजारसमितीची शिल्लक राहीलेली जागा त्या नंतरचे चेअरमन राजु भोसले यांनी विकली. या दोन महाकर्मयोगींच्या तावडीतुन सुटलेली सार्व.संडास,मुता-या, छोटे बोळ वजा रस्ते यांच्या जागा सध्याच्या सत्ताधार्यांनी विकुन एक न मोडणारा विक्रमच केला आहे.
बाजारसमितीमध्ये बर्याच बाबी अनियमित आहेत. तसेच बाजारसमितीशी संबंधीत कायदे-नियम धाब्यावर बसवुन, वाममार्गाने स्वार्थ साधला जात आहे. शेतक-यांची आस्था असलेल्या संस्थेत सहकार आणि बाजार या नावाखाली काय काय धंदे चालतात याचा प्रत्यय शेतक-यांसह सर्वसामान्य जनतेला आला आहे. बैलबाजार/आठवडीबाजार करीता आरक्षित असलेल्या जागेची विक्री करुन कशा प्रकारे विल्हेवाट लावावी याचे ठळक उदाहरण म्हणून बाजारसमितीच्या अशा कृत्यांकडे पाहीले जाते इतके यांचे कर्तुत्व आणि इतकं यांचं अतिकार्यक्षम आमदार नेतृत्व आहे. बाजारसमितीच्या असल्या धुर्तकर्मामुळे सातारा शहरात व आसपास ज्यांच्या खाजगी जागा मोकळया आहेत त्यांनी अत्यंत सावध राहीलं पाहीजे असेही कळकळीने सांगावेसे वाटते. नाही तर लांडगे जागेचा कधी लचका तोडतील हे सांगता येत नाही.
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैलबाजारासाठी आरक्षित असलेल्या जागेची केलेली विक्री रद्य करुन, त्याच ठिकाणी आठवडी बैलबाजार भरवण्याचे धाडस बाजारसमितीने दाखवावे अन्यथा तुमच्या सारख्या होयबा आणि बैलोबांचा बाजार मांडला जाईल असा सणसणीत टोला देखिल खा. उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.