सातारा : ऊसाला नियमाप्रमाणे त्याचबरोबर कायद्याप्रमाणे एफआरपी एकरकमी देण्यात यावी त्याचबरोबर हंगाम संपल्यानंतर खर्च वजा जाता कारखान्याकडे उरलेले उत्पन्न दुसर्या व तिसर्या हप्त्याच्या स्वरुपात शेतकर्यांना तात्काळ देण्यात यावे, असे न करणार्या साखर कारखान्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाने सोमवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा क्रांती मूक मोर्चा हे अराजकीय संघटन असून हे संघटन बहुसंख्य प्रश्नाने जनतेचे प्रतिनिधीत्व करते. त्यामुळे आम्ही आपल्याकडे शेतकर्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने काही मागण्या करत आहे. चालू वर्षी साखरेला सुमारे 3300 रुपये प्रतिक्विंटल असा भाव आहे. त्यामुळे साखरेचे मुल्यांकन 3000 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास बँकांनी केले आहे. त्यामुळे येणार्या गळीत हंगामात ऊसाला कायद्यानुसार एकरकमी एफआरपीनुसार पहिला हप्ता देण्यात यावा. तसे आदेशही आपण साखर कारखान्यांना द्यावे. जगाच्या बाजारपेठेत साखरेचे दर 4000 रुपये प्रतिक्विंटल आहेत. मात्र, निर्यातीवर टॅक्स लावल्यामुळे निर्यात करता येत नाही. तरी हा टॅक्स रद्द करून निर्यातीला चालना द्यावी. ज्यामुळे साखरेचे दर स्थिर राहणार आहेत.
काही साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीची उसदराची एफआरपी अदा केलेली नाही. त्या कारखान्यांना योग्य ती कायदेशीर कृती करण्यासाठी आपण कार्यवाही करावी. किफायतशीर व वाजवी किमंत (एफआरपी) हा उसदर अंतिम नाही. उसाच्या प्रक्रियेनंतर त्यापासून मिळणार्या उत्पन्नाच्या विक्रीनंतर खर्च वजा जातो. तो उसदर असतो. हे महाराष्ट्राच्या सारख कारखानदारीने प्रस्थापित केलेले समीकरण आहे. तथापी, एफआरपीपेक्षा जादा दर दिल्याने प्राप्तीकर वसूल केला जातो. या कारणास्तव एफआरपीपेक्षा जादा दर मिळत नाही. तरी आपण सरकारला असा प्राप्तीकर वसूल करण्यापासून परावृत्त करण्याची आपली मागणी कळवावी आणि तशी कार्यवाहीदेखील करावी. केवळ एफआरपी म्हणजे अंतिम दर नव्हे तर हंगाम संपल्यानंतर आम्हाला दुसरा आणि तिसरा हप्ता द्यावा, अशी आमची मागणी आहे. याबाबतही सरकारने स्पष्ट आदेश द्यावेत.
दरम्यान, मराठा क्रांती मूक मोर्चाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी मुद्गल यांनी सांगितले की, या मागण्याच्या अनुषंगाने मी साखर आयुक्त आणि सरकारशी चर्चा करतो. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी विनंतीही करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.