वार्ताहर
परळी
परळी खोऱ्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा सुरु होत्या. ओढे-नाले धबधबे हे एक दुथडी भरून वाहत होते परंतु शनिवारी रात्रीपासूनच पावसाने थोडी उसंत घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सज्जनगड फाट्याजवळील एक महाकाय वृक्ष रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उन्मळून पडले होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी झाडाचे काही भाग बाजूला करत एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी भात शेती पाण्याअभावी करपून जाते की काय अशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात होते परंतु चार पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे दऱ्या खोऱ्या नी हिरवागार शालू नेसला आहे त्यातच पावसाच्या संततधारेमुळे शेतीही धोक्यात आली होती परंतु शनिवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने शेतकरीवर्गाने ही निश्वास सोडला आहे. उरमोडी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याची आवकही कमी झाली असून रविवारी दहा वाजता पाणीपातळीही 694.91 मी असून एकूण पाणीसाठा 9.36 टीएमसी (93.96%) झाला असून सकाळी सात वाजेपासून सरासरी 4000 क्युसेक असून आवक कमी झाल्यास विसर्ग कमी करण्यात येईल तसेच विद्युत गृहातून 400 क्यूसेक तर जलाशयाच्या वक्र दरवाजातून 5398 क्यूसेक असे मिळून एकूण 5798 क्यूसेक पाणी विसर्ग सुरू असल्याचे उरमोडी शाखा अभियंता गणेश कणसे यांनी सांगितले आहे.