उरमोडीतुन विक्रमी विसर्ग!
गेल्या दहा दिवसांपासून सांडवा व नदीपात्रातून विसर्ग
वार्ताहर
परळी
यावर्षी गेल्या आठवडाभरापासून पावसाने सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच ओढ्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून व धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग सोडण्यात आला आहे.
उरमोडी प्रकल्पातून ह्या वर्षी दिनांक 22 जुलै पासून धरणाच्या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी 22 जुलै पासून सुरु करण्यात आलेला विसर्ग सलग दहाव्या दिवशीही सुरूच आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी मध्ये गेले आठवडाभर विसर्ग सुरू होता मात्र यावेळचा पर्जन्यमान जास्त असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. कास पठारावरील तांबी, भांबवली या परिसरात उरमोडीचे उगम होतो. यावर्षी भांबवली, तांबी, सांडवली, केळवली, पांगारे, पळसावडे या खोऱ्यातून पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मान खटावचा कॅनोलला तसेच वीज निर्मिती करून नदीपात्रातूनही विसर्ग सुरू केला आहे.
दुष्काळी माण खटाव ची वरदायिनी
उरमोडी नदीचा उगम तांबी भांबवली या परिसरातून होत असल्याने या परिसरात पावसाच्या पडला की धरणाची आवक वाढते. यावर्षी पावसाचे प्रमाण वाढल्याने गेले दहा दिवसांपासून उरमोडी जलाशयातून विसर्ग सुरू आहे. उरमोडी प्रकल्पामुळे दुष्काळी माण खटाव तालुक्याला बारा महिने मागणीनुसार पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने या परिसरातील बहुतांश भाग ओलिताखाली आला आहे.