वार्ताहर
परळी
जिल्हय़ात अतिवृष्टी होऊन जवळपास महिना लोटला असला तरी बाधित गावांची मूलभुत गरजांसाठी होणारी परवड ही संबंधीत प्रशासनाचा नाकर्तेपणा दर्शवत आहे. सातारा तालुक्यातील पळसावडे येथे झालेल्या अतिवृष्टीत पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वाहून गेली मात्र प्रशासकीय अधिकारी सोडाच ग्रामसेवकांनी गावाकडे दुर्लक्ष केल्याने एक महिन्यांपासून पळसावडे करांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्य़ातील अनेक गावांना बसला त्यातील काही गावे पुर्वपादावर आली सुध्दा मात्र पळसावडे येथे प्रचंड पावसामुळे धरणाचा सांडवा वाहून गेला होता. त्याचवेळी गावाची पाणी पुरवठय़ाची पाईप लाईन देखील वाहून गेली आहे. गावात 22 जुलैपासून पाणी पुरवठा हा खंडीत आहे. दैनंदिन वापरा करता झरा तसेच पावसाच्या पाण्यावर सध्या गावातील ग्रामस्थ दिवस ढकलत आहेत. या दुषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित यंत्रणा कुठे आहे असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. याबाबतचे लेखी निवेदन हे गटविकास अधिकारी पंचायत समिती, सातारा यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना शंकर गोरे, प्रकाश जानकर, धोंडिबा जानकर, बाबुराव जानकर, रामचंद्र शेडगे, लक्ष्मण जानकर, किसन कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
कोणी ग्रामसेवक पाहिलेत का?
गावातील असलेल्या समस्या संबंधीत अधिकाऱयांना तत्काळ पोहोचवण्याचे तसेच गावचा कारभार व्यवस्थीत सुरु आहे का? हे पाहणे ग्रामसेवकाचे काम मात्र पळसावडे येथे गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामसेवक गावात हजर राहिलेले नाहीत त्यामुळे महिना भरापासून सुरु असलेली पाण्याची वणवण अधिकाऱयांपर्यंत कधी पोहोचलीच नाही यामुळे कोणी ग्रामसेवक पाहिलेत का? असा सवाल गामस्थ करत आहेत.