सातारा: राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणा बाबत बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2019 ची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे ऐतिहासिक ठरली आहे. शिवसेना, भाजप व इतर पक्षांनी एकत्र येत महायुतीने व राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याबरोबर इतर पक्षांनी आघाडी करून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर वेगळच चित्र निर्माण झालं. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही त्याचा परिणाम होणार आहे. भाजप व शिवसेनेचे पुन्हा सरकार येईल अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नेत्यांचा भाजप व शिवसेनेकडे जाण्याचा ओघ वाढला होता. त्यामुळे काही ठिकाणी आघाडीला दमदार उमेदवारही मिळाले नाहीत. अशा स्थितीतही आघाडीने चांगल्या जागा मिळवल्या. मात्र निकाल लागल्यानंतर चित्र बदलले आहे.
खा.शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागू शकते. 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणुक शशिकांत शिंदे यांनाच लढवावी लागणार आहे. त्यामुळे आ.शशिकांत शिंदे यांना राज्यात मंत्रीपद देऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील त्यांना मिळावे अशी मागणी शशिकांत शिंदे समर्थक करू लागले आहेत. वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची
चिन्हे आहेत. माजी खा.स्व.लक्ष्मण तात्या पाटील यांचे व खा.शरद पवार यांचे सौख्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. स्व.लक्ष्मण तात्या पाटील यांनी सलग 10 वर्षे सातार्याचे प्रतिनिधित्व लोकसभेत केले. तर आ.मकरंद पाटील वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे आ.मकरंद पाटील यांच्या नावाची देखील चर्चा जोर धरू लागली आहे. पाटण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आ.शंभूराज देसाई व कोरेगाव विधानसभा मतदार संघातून आ.महेश शिंदे यांच्या समर्थकांनी देखील आपल्या नेत्याची मंत्रीपदी वर्णी लागण्याची भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांचे खाते वाटप होणार आहे. तीनही पक्ष तसेच मित्र पक्षांना सत्तेचा समान वाटा द्यायचा असल्याने, प्रत्येक पक्षास 12 ते 14 मंत्रीपदे वाट्याला येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची देखील सातार्याच्या पालकमंत्रीपदी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण?
RELATED ARTICLES