फलटण(अशोक भोसले) : श्री.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा चांदोबाचा लिंब येथे संपन्न होऊन तरडगाव मुक्कामी विसावला होता.पालखीचा एकच रात्रीचा मुक्काम होता.त्यामुळे भाविकांची दर्शन घेण्यासाठी पालखी विसावल्या पासून ते पहाटे पालखीचे प्रस्थान होईपर्यंत गर्दी पाहायला मिळत होती. लहानांपासून ते मोठया थोरांपर्यंत सर्वजण उपस्थित होते. प्रशासनातील व्यवस्थेकडून दर्शन रांगेची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. पालखीत लहान बाळांच्या खेळण्यांतील पिपाण्या कानांना ऐकू येत होत्या तर टाळवृंद वाद्याने भजन कीर्तनां मध्ये चांगली रंगत आणली होती. माउलींच्या सोहळ्याने पालखी तळ हा पूर्णपणे भक्तिमय झाला होता.
प्रस्थान होते वेळी अनेकांनी यावेळी माऊलींच्या रथासोबत आपले सेल्फी फोटो क्लिक केले.पहाटे पावणे सहा वाजता आरती झाल्यानंतर ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान तरडगावच्या पालखी तळावरून झाले. प्रस्थानाच्या अगोदर काही मिनिटे पोलिस प्रशासनाचे अधिकारीवर्ग यांनी आपल्या टीमला पुढील पालखी मार्गातील नियोजनाची माहिती दिली .प्रस्थानावेळी वेगवेगळ्या फुलांनी सजविलेला माऊलीचा रथ हा सुशोभित दिसत होता. त्यामुळे माऊलीच्या रथाचे हे देखणे रूप भाविकांना पुढील प्रवासात चालण्यासाठी नवी ऊर्जाच देत होती.माऊलीने निरोपच घेऊ नये.अशी भावना तरडगावकर भक्तांची झाली होती.परतीच्या प्रवासात पुन्हा आपली भेट होणार असल्याने भावुक झालेल्या चेहर्यांवर समाधानाचे भाव ही दिसत होते.काही भाविक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला निरोप देताना उभे होते तर काहींनी माऊली बरोबरच काळज पर्यंतचा चालत जाऊन प्रवास केला.तसेच काहींची पाऊले इथूनच पंढरीच्या दिशेने पडली.माऊलींच्या
पुढच्या सुखकर मार्गासाठी तरडगावकरांनी श्रद्धापूर्वक
तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच विठ्ठल विठ्ठलचा नामघोष आणि ग्यानबा तुकारामच्या भक्तीने अगदी भक्तीमय पूर्ण वातावरणात माऊलींच्या पालखी सोहळ्याला तरडगावकरांनी निरोप दिला.काळज, सुरवडी,निंभोरे,वडजल करीत पालखी फलटणच्या ऐतिहासिक नगरीत मुक्कामी दाखल.
तरडगाव हे वारकरी सांप्रदायिक गांव आहे. इथे वारीत आलेल्या प्रत्येक वारकर्यांचा सन्मान केलेला दिसून येत असतो.मोठ्या प्रमाणात भजनी मंडळी याठिकाणी आहेत.त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये तरडगावच्या वारकरी सांप्रदायाची परंपरा सर्वांना माहीत आहे. शिंदेंमाळ,माळेवाडी, कुसुर,विठ्ठलवाडी सासवड, आदर्की साखरवाडी सुरवडी,नांदल आदी सह आसपासच्या परिसरातील भाविक हे तरडगाव येथील पालखी तळावर दर्शनासाठी उपस्थित होते.
तरडगाव मधील संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून चांगल्या सोई सुविधा यावेळी पुरविण्यात आल्याने भाविकांची कोणतीही गैरसोय झाली नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने येणार्या सर्व भाविकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करीत शिस्त बद्ध सोहळा संपन्न होण्यासाठी खूप मेहनत घेतली. यावेळी प्रत्येक तरडगावकरांचे नियोजन प्रामाणिकपणाचे ठरले आहे.पालखी मुक्कामाच्या काही तासांच्या अवधीसाठी इथले संबंधित पोलिस प्रशासन होमगार्ड तसेच बाहेरून मागविण्यात आलेल्या फौजेने चोख बंदोबस्त ठेवला होता.तसेच वीज,पाणी, वारकर्यांचे आरोग्याची योग्य ती काळजी याबाबत कोणतीही कमतरता भासली नाही.
माऊलींच्या निरोपाने तरडगांवकर झाले भावुक
RELATED ARTICLES