फलटण : अतिवृष्टीने फलटण तालुक्यातील सर्व 126 गावात पेरणी झालेल्या 35572 हेक्टर क्षेत्रापैकी 38480 शेतकर्यांचे 15566.26 हेक्टर क्षेत्रातील विविध पीकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे तथापी शासन व विमा योजनेतून या शेतकर्यांना केवळ 16 कोटी 91 लाख 8 हजार 689 रुपयांची नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान पिकांव्यतिरिक्त राहती घरे, जनावरांचे गोठे, खाजगी विहिरी त्यावरील वीज मोटारी व पंप, पाईपलाईन, रस्ते, पूल, लघुपाटबंधारे व पाझर तलाव, जमिनींची धूप वगैरे. नुकसानीचे पंचनामे होवून अद्याप अहवाल उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे त्याची आकडेवारी देता आली नाही.
फलटण तालुक्यातील सर्व 126 गावात 35 हजार 572 हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारच्या पिकांची पेरणी/लागण झाली आहे त्यापैकी पंचनाम्यानुसार 38480 शेतकर्यांच्या 15566.26 हेक्टर क्षेत्रावरील पीके बाधीत झाल्याचे नमुद करण्यात आले असून त्यापैकी विमा योजनेतून 8 कोटी 34 लाख 6 हजार 689 आणि शासन नुकसान भरपाई म्हणून 8 कोटी 57 लाख 20 हजार असे एकुण 16 कोटी 91 लाख 8 हजार 689 रुपये आपद्ग्रस्त शेतकर्यांना मिळणार आहेत.
शासनाने बाधीत क्षेत्रातील विविध पीकांसाठी द्याव्याच्या नुकसान भरपाईची हेक्टरी रक्कम यापूर्वीच निश्चित केली असून त्यानुसार मिळणारी वरील नुकसान भरपाईची रक्कम अत्यल्प आणि शेतकर्यांना समाधान देणारी नसल्याचे दिसून येते. शासनाने निश्चित केल्याप्रमाणे द्राक्ष, डाळींब वगैरे फळबागा, फुलबाग यासाठी हेक्टरी 18 हजार रुपये, ऊस, कांदा, सोयाबीन वगैरे नगदी पीकासाठी हेक्टरी 13500 रुपये आणि ज्वारी, बाजरी, कडधान्य यासाठी हेक्टरी 6800 रुपये नुकसान भरपाई स्वरुपात दिली जात असून सदरची रक्कम अत्यंत कमी आहे, किमान पेरणी/लागण, मेहनत, मशागत, खर्चा इतकी तरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यात 2209 शेतकर्यांचा 1050 हेक्टर ऊस, 2106 शेतकर्यांचे 847 हेक्टर भाजीपाला, 1535 शेतकर्यांचे 713 हेक्टर सोयाबीन, 9361 शेतकर्यांचा 3311 हेक्टर कांदा, 256 शेतकर्यांच्या 135 हेक्टर द्राक्ष बागा, 2193 शेतकर्यांच्या 1346 हेक्टर डाळींब बागा, 87 शेतकर्यांचा 34 हेक्टर क्षेत्रावरील कापूस, 10831 शेतकर्यांची 4608 हेक्टर क्षेत्रावरील बाजरी, 4157 शेतकर्यांची 1660 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारी, 205 शेतकर्यांचे 70 हेक्टर क्षेत्रावरील कडधान्य, 265 शेतकर्यांचे 67 हेक्टर क्षेत्रावरील भुईमुग, 177 शेतकर्यांचे 77 हेक्टर क्षेत्रावरील सुर्यफुल, 4851 शेतकर्यांची 1555 हेक्टर क्षेत्रावरील मका, 38 शेतकर्यांचे 15 हेक्टर क्षेत्रावरील पोपई, 52 शेतकर्यांचे 22 हेक्टर क्षेत्रावरील पेरु, 40 शेतकर्यांचे 15 हेक्टर क्षेत्रावरील सीताफळ, 20 शेतकर्यांचे 9 हेक्टर वरील चिंच, 11 शेतकर्यांचे 3 हेक्टर क्षेत्रावरील लिंबू आणि 86 शेतकर्यांचे 25 हेक्टर क्षेत्रावरील फुलशेतीचे नुकसान झाले आहे.
फलटण तालुक्यातील शेतकर्यांना शासन व विमा योजनेतून केवळ 17 कोटीची नुकसान भरपाई
RELATED ARTICLES