सातारा, दि. ४ (जि.मा.का.) – राज्य शासनाने १ जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेच्या लाभ पासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे वेळी त्यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री डूडी म्हणाले, या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविका, ग्राम सेवक, तलाठी हे घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच अॅपच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. शासनाने या योजनेच्या अटी शिथिल केल्या आहेत. तसेच लागणारी कागदपत्र ही कमी केली आहेत. त्यामुळे या योजनेचा अर्ज करणे सोपे झाले आहेत.
अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासकीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करून जागेवर अर्ज भरण्याची प्रक्रिया करतील. आता डोमिसाइल प्रमाणपत्राचा पर्याय म्हणून १५ वर्ष जुने रेशन कार्ड किंवा मतदान ओळख पत्र ही चालणार आहे. त्यामुळे महिलांनी कागदपत्र काढण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता भासणार नाही. नवीन निकषांनुसार कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात किमान पन्नास कुटुंबांमध्ये एक शासकीय कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करेल. यामुळे जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजने पासून वंचित राहणार नाही.
तरी महिलांनी कोणतीही घाई न करता घरोघरी लाभ देण्याच्या या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.