Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमुथा इंजिनिअरिंग कंपनी युनियन निवडणूक कायदेशीर होण्याची मागणी

मुथा इंजिनिअरिंग कंपनी युनियन निवडणूक कायदेशीर होण्याची मागणी

सातारा : सातारा जिल्ह्यात राजकीय नेत्याच्या इशार्‍यावर चालणार्‍या कामगार युनियनमुळे औद्योगिक वसाहत ओस पडू लागली आहे. तर दुसर्‍या बाजूला कंपनी प्रशासनच युनियन काढून कामगारांचे नेतृत्व करीत आहे. ही बाब उघड झाली असून मुथा इंजिनिअरिंग प्रा. लि. येथील सुमारे 50 कामगारांनी सातार्‍यातील कामगार आयुक्तांना निवेदन देऊन कंपनीची युनियन निवडणूक कायदेशीर होण्याची मागणी केली आहे.
काल मुथा इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीच्या कामगारांनी सातार्‍यातील कामगार आयुक्त कार्यालयात दुपारी आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले. या कंपनीमध्ये सध्या दोन युनियन कार्यरत असून एका युनियनची निवडणूक तोंडावर आली आहे. ही युनियन कंपनी प्रशासनाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे कामगारांपेक्षा प्रशासन कंपनीचे हित पाहत आहे, असा आरोप करुन काही कामगारांनी आयुक्तांकडे दावा दाखल केला आहे. या दाव्याचे कामकाज पाहण्यासाठी दुसर्‍या कामगार युनियनच्या कामगारांनी हजर राहू नये, यासाठी कंपनी प्रशासन दबाव टाकीत आहे. तसेच कामावरुन काढण्याची धमकी याबाबत दिली जात आहे. सध्या वाढत्या बेरोजगारीमुळे या कंपनीत दररोज 50 ते 75 बेरोजगार युवक मिळेल त्या वेतनामध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे कंपनीला जादा वेतन देवून नियमित कामगारांना न्याय देणे हिताचे वाटत नाही. कामगारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी अटल विश्‍वकर्मा योजना कार्यान्वित केली आहे. बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेसाठी पाच हजार रुपयांपर्यंतचे साहित्य देण्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. परंतू सातारा जिल्ह्यात अनेक कामगारांना या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. काही कामगारांच्या ओळखपत्राचे नूतनीकरण केलेले नाही. तर काही औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी आपले उत्पादन कंत्राट बेसिसवर इतरांना चालविण्यास दिलेले आहे. याची कल्पना औद्योगिक वसाहत अधिकारी व कामगार अधिकारी यांना आहे. परंतू अद्याप एकाही कंपनीवर याबाबत कायदेशीर कारवाई झालेली नाही, असाही गंभीर आरोप कामगारांनी केलेला आहे.
काल एम. के. वनारसे, व्ही. बी. कदम, डी. ए. दीक्षित, एस. के. नगादी, एम. यु. बागल, आर. एस. जाधव, बी. एच अहिरे यांच्यासह पन्नास कामगारांनी फिलिप भांबळ यांच्या नेतृत्वाखाली कामगार आयुक्तांना निवेदन दिले आहे. या कामगारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु झाल्यामुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याला उत्तम प्रसिद्धी मिळाली आहे.
परंतू दुर्दैवाने सातारा जिल्ह्यात कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्ताधारी भाजपचा एकही नेता पुढे येत नसल्यामुळे कामगारांना बुरे दिन काढावे लागत आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा क्रांती जनरल कामगार युनियनने लाक्षणिक आंदोलन केले. पण त्याला फारसा प्रतिसाद कामगार आयुक्त कार्यालयातून मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कॉ. धनराज कांबळे, कॉ. उत्तम भालेराव., कॉ. शाम चिंचणे, शिवाजी इंगवले, कॉ. विठ्ठल पिसाळ, कॉ. नंदकुमार मोहिते यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular