सातारा, दि. २२ : प्रशांत महासागरातील बदलत्या हवामान परिस्थितीमुळे यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचे अनियमित वितरण, पावसातील दीर्घ खंड, उशिरा मान्सून आगमन, कमी पर्जन्यमान, तापमानात वाढ आणि मान्सूनची लवकर माघार आशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
एल निनो व संभाव्य खतटंचाईचा विचार करून कृषी विभागामार्फत जिल्हाभर विविध जनजागृती मोहिमा, शिवार फेऱ्या, शेतीशाळा, गाव बैठका आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे १३ हजार मोहिमा व बैठकींच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचविण्यात आले आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोखीम कमी करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती, आंतरपीक व मिश्रपीक लागवडीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. सोयाबीन-तूर, बाजरी-तूर, मूग-उडीद, ऊस-भाजीपाला अशा मिश्रपीक पद्धतीमुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकातून उत्पादन मिळू शकते. तसेच पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पीक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शून्य किंवा कमी मशागत, एकात्मिक खत व्यवस्थापन, जैविक खते व जैविक कीडनियंत्रण तंत्रांचा वापर करावा. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत, घनजीवामृत, गांडूळ खत, चिकट सापळे यांसारख्या घरगुती निविष्ठांचा वापर करून खर्चात बचत करता येईल. तसेच कमी कालावधीची आणि ताण सहन करणारी वाणे निवडण्यावर भर देण्याचे सांगण्यात आले आहे.
पडलेल्या पावसाचा कार्यक्षम वापर करण्यासाठी बीबीएफ (Broad Bed Furrow) किंवा सरी-वरंबा पद्धतीने पेरणी, शेततळ्याद्वारे संरक्षित सिंचन, उताराला आडवी मशागत, पिकांमध्ये जैविक आच्छादन, समतल मशागत, जैविक बांध आणि जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. “मागेल त्याला शेततळे” योजनेचा लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरणीयोग्य ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. हवामान अंदाज आणि कृषी विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. खते, बियाणे किंवा खरीप हंगामातील इतर अडचणींबाबत गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती फरांदे यांनी केले आहे.
यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक असला तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यास नुकसान टाळून उत्पादनात स्थिरता राखणे शक्य होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
0000

