जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल
सातारा : भारत निवडणूक आयोगाचे व जिल्हा प्रशासनाचे होणार्या लोकसभा निवडणुकीवर अतिशय बारकाईने लक्ष असून कुठल्याही उमेदवाराने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास अशा उमेदवारावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलवडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.
28 मार्च 2019 पासून नामनिर्देशनत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशनपत्र भरताना कुठलीही चुक करु नका. चुकीमुळे नामनिर्देशनपत्र बाद होऊ शकते. उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र स्वत: तपासून घ्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, नामनिर्देशनपत्र आवक-जावक विभागात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिलच्या दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचे नामनिर्देशनत्र स्वीकारले जाणार नाही. उमेदवारांनी प्रचार खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे या खात्यातून प्रचार खर्च करावा. भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाच्या मर्यादा दिल्या आहेत. प्रत्येक उमेदवारांच्या बँक खात्यावरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांनी खर्चाच्या मर्यादा आलांडू नका. जे मर्यादा ओलांडतील अशा उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे.
उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध परवान्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. उमेदवाराने परवान्यासाठी अर्ज केल्यास 24 तासात परवाना दिला जाईल. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संपर्क साधवा, त्यांच्या अडचणी निश्चितपणे सोडविल्या जातील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी सांगितले.
जिल्ह्यात 24 मतदान केंद्रे संवेदनशिल व अतिसंवेदनशिल आहेत. पक्षाच्या पदाधिकार्यांना जिल्ह्यातील मतदान केंद्रे संवेदनशिल वाटत असल्यास अशा मतदान केंद्राची माहिती द्या. या मतदान केंद्रांचे सर्व्हे करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी यावेळी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैद्य मद्य विक्री होणार यासाठी जिल्ह्यात चार पथकांची स्थापना केली आहे. हे चार पथक रात्रंदिवस काम करीत आहे. भविष्यात आणखीन पथक कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी या बैठकीत सांगितले.
लोकसभा निवडणूक लढवणार्या उमेदवारांनी प्रचाराचे साहित्य जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे. जे उमेदवार पडताळणी न करता प्रचार साहित्य प्रचारासाठी वापरत असेल अशा उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित केलेल्या प्रचार साहित्यासाठी देण्यात आलेला जावक क्रमांक प्रचार साहित्यावर टाकने बंधनकार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी सहायक निवडणूक अधिकारी किर्ती नलवडे यांनी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे कसे भरावी या संदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आचारसंहितेचे काटेकोर पालन करा;निवडणूक प्रशासन दक्ष
RELATED ARTICLES