पाटण:- सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी आपली आई व समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका श्रीमती सुहासिनी पिसाळ यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन शनिवारी पाटण नगरपंचायती मधील चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांसह शहरातील १०० गोरगरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप केले. यावेळी सोशल डिस्टनिंगचे शंभर टक्के पालन करण्यात आले.
दरम्यान, समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ९ मार्चपासून आजपर्यंत पाटणसह परिसरातील तब्बल ५०० च्यावर गोरगरीब कुटुंबाना नितीन पिसाळ यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्यांचे वाटप केले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात गरीब लोकांना त्यांनी मदतीचा हात दिल्याने लोकांमधूनही त्यांना धन्यवाद दिले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन नंतर खऱ्या अर्थाने पाटण शहरासह परिसरातील हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. काम नसल्याने रोजचे चलन बंद झाले. चलन बंद झाल्याने गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. अश्यावेळी शासनाची कसलीही वाट न पाहता सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी कर्तव्य भावनेने सामाजिक उत्तदायित्व स्वीकारून गोरगरीब कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला. आजपर्यंत त्यांनी समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल ५०० च्या वर गोरगरीब कुटुंबाची भूक भागवली आहे. अक्षरशः पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे विनास्वार्थ ते लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत गरीब लोकांच्या तोंडात अन्नाचा घास जाण्यासाठी धडपडत आहेत. गोरगरिबांसाठी नितीन पिसाळ यांच्या माध्यमातून देवदूतच धावून आला असल्याच्या प्रतिक्रियाही समाजमनातून उमटू लागल्या आहेत.
एवढे करत असताना ते आपल्या आईचा वाढदिवसही विसरले नाहीत. आईच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. २५ रोजी त्यांनी पाटण नगरपंचायतीमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच शहरातील मोरेगल्ली, रामापूर, ब्राह्मणपूरी, सिद्धार्थ कॉलनी, भडकबाबा नगर अशा शहरातील विविध ठिकाणच्या १०० गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्यिचे वाटप केले. खऱ्या अर्थाने अश्या लोकांची समाजाला गरज आहे. त्यांचे हे कार्य इतरांना प्रेरणादायी असेच आहे. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही अश्या कठीण प्रसंगी पुढे आले पाहिजे.
ही मदत वाटपप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, यशवंतराव जगताप, पाटणचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस रविंद्र सोनावले, हॉटेल सुस्वादचे मालक विठ्ठलराव यादव, राजेंद्र पाटणकर, जॉन्सन कुटो, समर्थ सुहास चॅरिटेबलचे संस्थापक अध्यक्ष नितीन पिसाळ, विजयकुमार गायकवाड, कविवर्य अनिल बोधे, सचिन भिंगार्डे आदी उपस्थित होते.