परळी :- तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन खरीप पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. मात्र पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होणार आहे.
निसर्ग वादळामुळे मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.परळी खोऱ्यातील मुख्य पिक असणाया भात,भुईमूग पिकाच्या पेरणीस शेतकऱ्यांनी सुरूवात केली असून भात रोप टाकण्याचे काम सुरू आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव परळी खोऱ्यात ही असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत एप्रिल ते मे महिन्यात नांगरणीची कामे उरकली होती.त्यात निसर्ग चक्रीवादळ व मुसळदार पावसाचे संकट शेतकऱ्यांच्या समोर आले होते. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे थोड्या फार प्रमाणात पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे.पेरणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबत मुंबईहून आलेले चाकरमान्यांनी मशागत व पेरणीच्या कामात व्यस्त करून घेतले आहे. जिरायती क्षेत्रात जमिनीमध्ये शेतकऱ्यांकडून पेरणी उरकण्याचे काम चालू आहे.
करोनाच्या व निसर्ग चक्रीवादळ या संकटात खरीप पेरणीची लगबग चालू असताना शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी बी-बियाणांच्या दुकानामध्ये सुरक्षित अंतर ठेवून लांबलचक रांगा लावताना दिसत आहेत.पावसाअगोदर बी -बियाणे रासायनिक खते यांचा साठा शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत.त्यामुळे शेतकरी करोना व निसर्ग चक्रीवादळ सारख्या संकटातही आत्मनिर्भर होऊन सध्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.