वार्ताहर
परळी
कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय-45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3.00 च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपुर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्ताऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबडय़ा आगीत जळून खाक झाले. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पालाया भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की, कारी (ता. सातारा) येथील विलास भातुसे यांच्या घराला अचानकपणे लागलेल्या आगीने मोठे आर्थिक नुकसान झाले. माळय़ावरील कडबा तसेच शेजारी गवताची गंज यांमुळे संपुर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. भातुसे यांनी घरालगतच कुकुटपालन केले असल्याने 100 हून अधिक कोंबडय़ा ह्या जळून खाक झाल्या. आगीचे लोट जस जसे वाढत होते. तसे ग्रामस्थ ही आग अटोक्यात आणण्यासाठी धडपड करत होते. अखेर फायरब्रिगेड गाडी बोलावून आग अटोक्यात आणली. याच दरम्यान विलास भातुसे हे आगअटोक्यात आणताना पायाला भाजले असता त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आगीचे कारण समजले नसुन नुकसानीचा पंचनामा रात्री उशीरापर्यंत झाला नव्हता. मात्र कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 8 ते 9 लाखाचे नुकसान झाल्याची त्यांनी सांगितले.
चौकट
डोळय़ासमोर घर पेटते पाहुण अश्रू अनावर
ज्या घरात राहून भविष्याचे स्वप्न रंगवले जातात मात्र तेच घर डोळय़ासमोर आगीच्या भक्षस्थानी आलेले पाहून भातुसे कुटुंबिय गहिवरुन गेले होते. संपुर्ण गाव आग आटोक्यात आणण्यासाठी झटत होते मात्र आगीचे लोट हे वाढतच होते.