वार्ताहर
परळी
वळीवाची हजेरी ही परळी खोऱयात गेल्या आठवडाभरापासून आहे. सोसाटय़ाचा वारा अन् गारांचा भडीमार अशातच परळी ते केळवली रस्त्यावरील आलेले मातीचे लोट यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीतांनी तत्काळ रस्त्यावरील गाळ काढून वाहनधारकांची होणारी त्रेधातिरपीठ थांबवावी अशी मागणी वाहनधाकांमधून तसेच ग्रामस्थांकडून होत आहे.
सातारा जिल्हय़ात वळीव पाउस हा गेल्या आठवडयाभरापासून सातत्याने बरसत असल्याने मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परळी ते कातवडी हा रस्ता दुरुस्तीचे काम काही दिवसांपुर्वी पुर्ण झाले, मात्र नाले खुदाई ही न केल्याने वळीवाने डोंगर उतारावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना धक्का मारत वाहने गाळामधून बाहेर काढावी लागत आहेत. परळी ते केळवली हा रस्ता प्रमुख रस्ता असून या मार्गाहून अनेक गावांना ये-जा करण्यास सोईस्कर ठरते मात्र वळीव पावसाने आलेले मातीचे लोट यामुळे हा मुख्य रस्ता आहे की गावातील अंतर्गत पांद रस्ता असा प्रश्नच उभा राहत आहे.
मान्सुन आधी ग्रामीण भागातील नाले सफाई तसेच खुदाई ही सुरु झाली पाहिजे. मात्र संबंधीत प्रशासन डोळेझाक करत असल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गाडी गाळात बंद पडली तर तासंतास हे गाडी बाहेर काढण्यासाठी वेळ जात आहे. असे वाहनधारकांनी सांगितले.
आता बाजारहाट मिळणार कसा?
साताऱयातील कोरोना आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढतीच असल्याने गेल्या आठवडाभरापासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे बाजारहाट बंद झाले. घरपोच सेवा ही ग्रामीण भागात थोडीफार होत सुरु होती. मात्र रस्त्यावर गाळ हा मोठय़ाप्रमाणावर साचल्याने बाजारहाट देखील मिळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी तत्काळ रस्त्यावरील सफाई करुन नाले सफाई करावी
काशिनाथ घाग, ग्रामस्थ कातवडी