सातारा : गणपती विसर्जनासाठी नगर पालिकेमार्फत गेल्यावर्षी कृत्रीम तळे तयार करण्यात आले होते. मात्र यासाठी लागणारा निधी नगर पालिका देण्यास असमर्थ असल्याने सर्व साधारण सभेत विसर्जनाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टोलावला होता. या अनुषंगाने दि. 13 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नगर पालिकेचे मुख्याधिकारी आपली बाजू मांडणार आहेत.
दरवर्षी गणपती विसर्जनासाठी शहरातील मंगळवार तळे, उपलब्ध होत असे. मात्र तेथील नागरिकांनी या तळ्यात विसर्जनास मज्जाव केल्याने सातारा नगर पालिकेने राधिका रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेत 50 लाखाचे कृत्रीम तळे काढून गेल्या वर्षी गणपती विसर्जनासाठी खुला केला. मात्र दरवर्षी विसर्जनावेळी नवीन कृत्रीम तळे खोदावे लागणार असल्याने नागरिकांचे किमान 50 लाख रूपये पाण्यात जाणार आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या सर्व साधारण सभेत गणपती विसर्जनाचा निर्णय सोपवत त्यांनीच काय तो निर्णय द्यावा असा ठराव नगर सेवकांनी केला.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून दिला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आश्विन मुद्गल यांनी तात्काळ आज सकाळी 11 वा. नियोजन भवनात बैठकीचे आयोजन केले. या बैठकीकडे सर्व सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.